महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २६ नोव्हेंबर ।। “आमच्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्यावर कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवायला लागले आहे. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला वाटावा तेवढा फायदा झाला नसावा. यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा.”
विधानसभेतील (Maharashtra Assembly Election) संख्याबळ १६० च्या पुढे कसे गेले, याचे आश्चर्य भाजपच्या (BJP) लोकांनाही वाटत असेल. कुणाल पाटील यांना त्यांच्या राहत्या गावात एकही मत मिळाले नाही, हे आश्चर्यकारक आहे. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला (Gujarat) जातात आणि गुजरातची ईव्हीएम (EVM) महाराष्ट्रात येतात. त्यामुळे त्यात काहीतरी घोळ असून, महाराष्ट्रातील बऱ्याच उमेदवारांचे मताधिक्य जवळपास सारखेच कसे काय? ईव्हीएमबाबतची भूमिका नक्कीच संशयास्पद आहे.
निवडणूक आयोगाने आमच्या अनेक प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी यांनी आज केली. ईव्हीएम संदर्भातील न्यायालयीन लढाईबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असेही त्यांनी (MLA Rohit Pawar) सांगितले.
ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यासाठी आमदार पवार आज येथे आले होते. त्याचदरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यासमोर व विचारांसमोर आपण नतमस्तक होऊन प्रेरणा घेतली आहे. पुढील पाच वर्षे जनतेच्या विकासासाठी व महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी लोकांमध्ये जाऊन आम्ही सर्वजण लढत राहणार आहोत. त्याला विधानसभा निकालानंतरच सुरुवात केली असल्याचे सांगून पवार म्हणाले, ‘‘ईव्हीएमसंदर्भातील न्यायालयीन लढाईबाबत महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते योग्य तो निर्णय घेतील. विषय न्यायालयात गेल्यावर त्यांनी योग्य वेळेत निकाल देणे गरजेचे आहे. नाहीतर राष्ट्रवादी कोणाची? याबाबतच्या निकालाला तीन वर्षे कधी निघून गेली, हे कळलेही नाही. उशिरा दिलेले निकाल म्हणजेही अन्यायच असतो.’’
नवीन सरकार २६ नोव्हेंबरपर्यंत राज्यात स्थापन करणे गरजेचे आहे; परंतु लोकशाही आणि संविधान पाळणारे हे पक्ष नाहीत. ते मनमानी करतील. न्यायालयाची भूमिकाही काही निर्णयांबाबत संशयास्पद असल्याने न्यायालयात जाऊनही काही उपयोग नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या न्यायालयीन सुनावणीबाबत ते म्हणाले, ‘‘उच्च व सर्वोच्च न्यायालयाकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. सातारा जिल्ह्यात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब पाटील, पृथ्वीराज चव्हाण, सत्यजितसिंह पाटणकर यांना जवळपास सारखी मते पडली आहेत.
आमच्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्यावर कुठेतरी पाणी मुरत असल्याचे जाणवायला लागले आहे. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला वाटावा तेवढा फायदा झाला नसावा. यामागे दुसरे काहीतरी कारण असावे, त्याचा अभ्यास करायला हवा. हाताला काम आणि पोटाला अन्न या व्यतिरिक्त हिंदुत्वाच्या मुद्द्यावर प्रचाराची दिशा वळवली गेली. संतांच्या भूमीत भाजपने मोठ्या प्रमाणावर केलेल्या भेदभावालाही काही प्रमाणात यश आले. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीत दोन्ही उमेदवार पाडण्याचे कारण ईव्हीएम, तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्याची केलेली वातावरण निर्मिती, हेही असावे.’’
रोहित पवारांनी उपस्थित केलेले मुद्दे…
निवडणूक आयोग महायुतीच्या खिशात
महाराष्ट्रातील निकाल लोकांनाही अपेक्षित नसणारा
नेत्यांनी तो स्वीकारला; पण पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी अवघड
पोस्टल मतांचा कौल आणि ईव्हीएमचा कौल फारच वेगळा
निवडणूक आयोगाने समर्पक प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित
शिंदेसह पवारांचे उमेदवार पाडण्यामागे फडणवीस…
एकनाथ शिंदे पहिले एक वर्ष मुख्यमंत्री राहतील. नंतरचे चार वर्ष भाजपकडे मुख्यमंत्रिपद राहील, असा अंदाज व्यक्त करून आमदार पवार म्हणाले, ‘‘२०२९ मध्ये एकहाती सत्ता मिळवण्याची भाजपची रणनीती आहे. त्याला यावेळी काही प्रमाणात यश आले आहे. ते आता १४४ ला कमी पडले. मनसेने बऱ्याच ठिकाणी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे उमेदवार पाडले. यामागे फडणवीस यांचे डोकं होतं. त्याचबरोबर सध्याचे समीकरण पाहता अजित पवार यांना दोन वर्षे मुख्यमंत्रिपद मिळेल, असे वाटत नाही.’’ गेल्यावेळी त्यांना मिळालेली मंत्रिपदे यावेळी मिळाली तरी पुष्कळ झाले, असाही टोला त्यांनी लगावला.