महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि.२२ डिसेंबर ।। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आताही फरार आहेत. शनिवारी शरद पवार आणि अजित पवार यांनी देशमुख यांच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी पवारांनी आपण संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाचं पाहण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र अजित पवार भेटून गेल्यावर ग्रामस्थांनी माध्यमांसोबत बोलताना आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवली. अजित पवार यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांच्याशी बातचीत केली आणि निघून गेले. यावरून ग्रामस्थांनी आमचे म्हणणे एकून न घेतल्याने त्यांनी यायचं तरी कशाला असा सवाल केला.
धनंजय मुंडे यांना पद देऊ नका, आमचं म्हणणं ऐकून घ्या. अजित पवार आले आणि दोन मिनिटात निघून गेले. आम्ही त्यांना म्हटलं की जोपर्यंक एसआयटी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात नको, परंतु त्यांनी ऐकलं नाही मग त्यांनी यायचंच कशाला? असा संतप्त सवाल मस्साजोग ग्रामस्थांनी केला.
काहीच आश्वासन दिलं नाही, सारवासारव केले आणि निघून गेले. आम्ही गाववाले त्यांना काय सांगत होतो, जर त्यांना ऐकायचं नव्हतं तर नागपूरहून सांगायचं ना. त्यांची पकडायची काही लक्षण दिसत नाही. आमची मागणी धनंजय मुंडेने मंत्रिपद देऊ नये आणि वाल्मिक कराडला अटक करावी. महाराष्ट्राचं गृहखातं देशात नंबर वनल आहे, पण तेरा दिवस झाले तरी तीन आरोपी सापडत नाहीत. गृहखात्यावर विश्वास राहिल का? असंही मस्साजोगच्या ग्रामस्थांनी म्हटलं आहे.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपी अटकेत आहेत. यामधील चार जण अटकेत आहेत आणि तीन जण फरार आहेत. विष्णु चाटे, जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले हे अटकेत असून सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे फरार आहेत. यामधील विष्णु चाटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा केज तालुक्याचा अध्यक्ष होता. त्याची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. तर वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा अत्यंत विश्वासू आणि जवळचा मानला जातो.