महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ५ जानेवारी।। उत्तर भारतातील राज्यांमधून येणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा वेग पकडला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून गायब झालेली थंडी पुन्हा आली आहे. या थंड वाऱ्यामुळे महाराष्ट्र गारठला आहे. या थंड वाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यांमधील किमान तापमानाचा पारा आणखी घसरला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील किमान तापमान ११ अंश सेल्सिअसच्या खाली गेले आहे. राज्यात पुढील ३ दिवस थंडी कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत राज्यात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमनान १ ते ३ अंशाच्या खाली जाण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान १० अंशाच्या खाली जात असल्याची नोंद झाली आहे. यवतमाळचे तापमान ७.६ अंश सेल्सिअसवर पोहचले आहेत. तर सोलापूर, सांगली, पुणे गोंदिया आणि नगर याठिकाणचे तापमान ८ अंशावर पोहचले आहे. तर राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये १० ते १२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
थंडी वाढल्यामुळे आता राज्यात पुन्हा शेकोट्या पेटू लागल्या आहेत. थंडी वाढल्यामुळे नागरिक स्वयटर आणि जाड कपडे घालताना दिसत आहेत. सध्या राज्यात सकाळी गारठा आणि दिवसा कडाक्याचे ऊन पाहायला मिळत आहे. आजही राज्यात आकाश निरभ्र आणि स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. सध्या भारतामधील उत्तरेकडील राज्यातही थंडी प्रचंड वाढली आहे. अनेक राज्यात धुक्यांची दाट चादर पसरली आहे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या राज्यात पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. काश्मीरमध्ये बर्फावृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.े त्यामुळेच उत्तरेकडील राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यात कुठे थंडी जास्त?
पालघर – १२.९
मुंबई – १६.२
ठाणे – २१.२
रत्नागिरी – १८.९
परभणी – ११
नाशिक – १०.१
अहमदनगर – ७.७
छत्रपती संभाजीनगर – ११.६
डहाणू – १६.७
जळगाव – ९.६
कोल्हापूर – १५.३
महाबळेश्वर – १३.८
नांदेड – ११.२
नंदुरबार – १२.८
धाराशीव – १२.३