महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांसाठी विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे. राज्यभरातील १ लाख ८ हजारांपेक्षा अधिक जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. पालकांना १४ ते २७ जानेवारी या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. महत्वाचे म्हणजे आरटीई फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द होणार आहे. त्यामुळे पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवूनच अर्ज भरणे गरजेचे आहे.
आरटीई पोर्टलवरील आकडेवारीनुसार, राज्यभरातील ८ हजार ८४९ शाळांनी प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला आहे. या शाळांमध्ये प्रवेशासाठी एकूण १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुणे जिल्ह्यात उपलब्ध असतात. यंदाही पुणे जिल्ह्यातील ९५१ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यात १८ हजार ४५१ जागा प्रवेशासाठी उपलब्ध असल्याचे दिसून येत आहे.
आरटीई २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी आजपासून अर्ज करता येणार आहे. आरटीई फॉर्ममध्ये खोटी माहिती भरल्यास प्रवेश रद्द होणार आहे. निवासी पुरावा, जन्म तारखेचा पुरावा, जातीचा दाखला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल संवर्गातील प्रवेशाकरिता वार्षिक उत्पन्नाचा दाखला यासारखे कागदपत्र महत्त्वाचे आरटीई प्रवेशासाठी महत्वाचे आहेत.
पालकांनी ऑनलाइन अर्ज करताना अचूक माहिती भरावी अशी सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या आहेत. पालकांना ‘https://student.maharashtra.gov.in/adm_portal’ या लिंकवर विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी खोटी, चुकीची माहिती भरून प्रवेश निश्चित केला आणि ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आल्यास खोटी, चुकीची माहिती भरून दिशाभूल केल्याप्रकरणी आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.