महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ जानेवारी ।। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मोठी खळबळ निर्माण झाली. आता देशमुखांच्या हत्येला एक महिना होऊन गेला असून अद्याप एक आरोपी फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीचा गुन्हा दाखल आहे. कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देशमुख कुटुंबियांकडून केली जात आहे. आमदार सुरेश धस आणि संदीप क्षीरसागर यांनी थेट धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी याप्रकरणात केली आहे.
बीडमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला राज्यातील मोठे नेते दाखल झाली होती. जितेंद्र आव्हाड हे देखील पोहोचले होते. आता जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी मोठे भाष्य केले आहे. फक्त भाष्यच नाहीतर त्यांनी खळबळजनक खुलासे केल्याचे देखील बघायला मिळतंय. आव्हाडांनी म्हटले की, याप्रकरणी जर वाल्मिक कराड नसेल तर पुढे येऊन तुम्ही सांगा.
तुम्ही लोकांपासून कशाला काही गोष्टी लपवता. पुढे आव्हाड म्हणाले की, तक्रार लोक करायचे आणि वाल्मिक कराड लगेचच बाहेर यायचा म्हणून लोक तक्रार करायला घाबरत आहेत. 302 चा गुन्हा दाखल होईल, तेव्हा अजून 50 खुनाचे प्रकार समोर येतील, असा थेट मोठा दावाच जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. आता जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानाने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. आता जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरू झालीये.
काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले होते की, 80 टक्के खून हे कराडने केली आहेत. कराड याच्यावर सतत गंभीर आरोप केले जात असून त्याची चाैकशी सुरू आहे. खंडणीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा काही दिवस फरार होता. त्यानंतर पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात दाखल होत वाल्मिक कराड याने आत्मसमर्पण केले. त्यानंतर त्याला बीडमध्ये आणत केज न्यायालयात दाखल केले.