महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. १४ ऑगस्ट – मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यात रविवारी आणि सोबतच सोमवारी वेधशाळेने अतिवृष्टीचा इशार देत अंबर अलर्ट जाहीर केला आहे. या जिल्ह्यांतील काही भागात 204 mm पर्यंत पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये सोमवारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता असून तिथेही अंबर अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
मुंबईत आज जोरदार वारे वाहत होते. काही ठिकाणी 25 ते 27 किलोमिटर ताशी वेगाने वाऱ्यांचा वेग नोंदविण्यात आला. तर उद्या म्हणजेच शनिवारपर्यंत ताशी 45 ते 55 किलोमिटर वाऱ्यांच्या वेगासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवार आणि सोमवारी पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर या तीन जिल्ह्यांमधील काही भागात 204 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. वेधशाळेने अंबर अलर्ट जाहीर केला असून सर्व यंत्रणांनाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सोबतच नाविक दल, तटरक्षक दल तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आपात्कालीन परीस्थीतीसाठी तैनात आहे. तर मुंबई अग्निशमनदलाची फ्लड रेस्क्यू टिमही अलर्टवर ठेवण्यात आली आहे.
वेधशाळेचा कलर कोड काय म्हणतोय :
हिरवा – इशारा नाही
पिवळा – तयारी करा
अंबर – सज्ज राहा
रेड -प्रतिबंधात्मक उपाय करा
महामुंबईत रविवार आणि सोमवारी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिधुदूर्ग जिल्ह्यात सोमवारपर्यंत अतिवृष्टीची शक्यता वर्तवली गेलीये. या जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनाही अलर्ट राहाण्याची सुचना हवामान विभागाकडून करण्यात आली आहे.
दक्षिण मुंबईत आज पावसाचा जोर फारसा नव्हता. दादरच्या शिवाजी पार्क येथे शहरातील सर्वाधिक 57.59 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला असून दहिसर येथे 41.5 मि.मी पावसाची नोंद झाली आहे. तर पुर्व उपनगरात अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. पवई येथे 25.8 मि.मी पावसाची नोंद झाली आहे.