महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ ऑगस्ट – पुणे – कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांसह आता पुणे जिल्ह्यातील काही भागातही पुराचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. कारण मुळशी धरण परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आज सकाळी 11 ते 12 दरम्यान मुळशी धरणाच्या सांडव्यातून 1 हजार क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्ज्यन्यमानानुसार त्यामध्ये वाढ संभवू शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
‘कृपया धरणाच्या खालील भागातील नदी काठची गावे, वाड्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरीकांनी सुरक्षेच्या कारणास्तव नदी पात्रात प्रवेश करू नये. वीजेवरील मोटरी, इंजिने, शेती अवजारे अथवा तत्सम साहित्य तसेच पशुधन यांचेही सुरक्षिततेची काळजी घेऊन कोणत्याही प्रकारे जीवित वा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी,’ असे आवाहन करण्यात आलं आहे.
कृपया याची नोंद घ्यावी आणि नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना तात्काळ देण्यात याव्या, असंही धरण प्रशासनाने सांगितलं आहे.