महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। बुधवार दि. ५ मार्च ।। धनंजय मुंडेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला काय अन् नाही दिला काय? त्याचे काही नाही; परंतु यातून त्यांची मगरूरी तशीच दिसून येत आहे. त्यांची मगरूरी संपलेली नाही. मुंडे खुनाच्या गुन्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांना सहआरोपी करा. खून प्रकरणातील आरोपींना भरचौकात गोळ्या घाला, अशी मागणी मराठा आरक्षण संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी बुधवारी (ता. चार) छत्रपती संभाजीनगरात केली. उपचारादरम्यान एका खासगी रुग्णालयात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
जरांगे पाटील म्हणाले, की सरपंच देशमुख यांचा इतका क्रूरपणे खून केला गेला. हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सातत्याने झाला. मात्र जनतेने हा लढा हाती घेतल्याने ८० दिवसांनंतर हे प्रकरण समोर आले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही मगरूरी जनतेसमोर आली आहे. हे सरकार म्हणजे ‘तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो’ अशी भूमिका घेत आहे.
मनोज जरांगे यांना भोवळ आल्याने त्यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सरपंच देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी मध्यरात्रीनंतर पहाटेच हाताला लावलेल्या सलाइनसह मस्साजोग गाठत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांची भेट घेत सांत्वन केले. दरम्यान, मगरूरी करणारे सर्वजण लयास जाणार आहेत. यांची लंका एक दिवस बुडणार आहे, या प्रकरणात १५० पेक्षा अधिक आरोपी झाले असते, असा आरोपही जरांगे यांनी केला.
मुंडेंनी आंधळेला गायब केले…!
सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अटक होणे बाकी असून, त्याला धनंजय मुंडे यांनीच गायब केले आहे. दुसरा आरोपी चाटे याचा मोबाइलही मुंडेंकडे आहे. त्यामुळे, त्यांनी आमदारकीचाही राजीनामा द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली.