भर उन्हाळ्यात हे काय सुरुय? ; राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। मंगळवार दि. १८ मार्च ।। होलिकादहनानंतरही देशभरात तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहेत. अद्यापही उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम असून ही संपूर्ण स्थिती पश्चिमी झंझावाताच परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणास्तव पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसानं शिडकावा केला असून, इथं महाराष्ट्रातही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे.

देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे वारे पाहता राज्यात काही अंशी दमट हवामान पाहायला मिळू शकतं. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करायचा झाल्यास इथं राज्यभरात उन्हाचा तडाखा कायम राहील. तर, काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण कायम असेल. राज्यात सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळं जळगाव, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर इथं ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळमध्येही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशी शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे.

राज्यावर एकिकडे उन्हाळ्यातच पावसाचं सावट असतानाच दुसरीकडे विदर्भ आणि तिथं सोलापूरात पारा उच्चांकी पातळीवरही पोहोचला आहे. बहुतांश भागांमध्ये तापमान चाळीशीपलिकडे गेल्यानं बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं उन्हाचा दाह वाढत असतानाच मधूनच येणारं पावसाळी ढगांचं सावटही नागरिकांना राज्यात अनुभवता येणार आहे.

मुंबईत कोरड्या वाऱ्यांची सरशी
पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण कोरडं राहणार असून, किमान तापमान 26 ते 27 अंशांदरम्यान राहू शकतं. तर, दुपारी तापमानाचा पारा कमाल 36 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. इथं दाह मात्र 38 अंशांइतका असल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. ज्यामुळं मुंबईकरांनी उकाड्यापासून इतक्यात सुटका नाही हेच आता स्पष्ट होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *