महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १० एप्रिल ।। एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मार्च महिन्याचा वेतन फक्त 56 टक्केच देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे तर सुरक्षा रक्षकांना केवळ 50 टक्के पगार मिळणार आहे.
महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते. मात्र राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्याने संकट निर्माण झालं आहे. त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार आहे.
या निर्णयामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. पगाराच्या वेळोवेळी होणाऱ्या कपातीमुळे त्यांच्या रोजच्या गरजा भागवणंही कठीण झालं आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात आहे.