Weather Update: राज्यात चैत्रातच पेटला वणवा ; बहुतांश शहरांचा पारा 43 अंशांवर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ एप्रिल ।। राज्यात चैत्र महिन्यातच यंदा वैशाख वणवा पेटला असून, बहुतांश शहरांचा पारा 43 अंशांवर गेला आहे. गुरुवारी विदर्भातील अकोला शहराचे तापमान सर्वाधिक 44.1 अंशांवर गेले होते. त्या पाठोपाठ पुणे, चंद्रपूर, यवतमाळ शहरांचा पारा 43 अंशांवर गेला होता. राज्याचे सरासरी तापमान 42 अंश इतके होते. राज्यात रविवार (दि.21) पर्यंत उष्णतेची लाट सक्रिय राहणार आहे.

दरवर्षी मे महिन्यात वैशाख मास येतो आणि तेव्हा उन्हाचा प्रखर चटका टिपेला म्हणजे 44 अंशांवर जातो. त्यामुळे सर्वंत्र वैशाख वणवा पेटला असे म्हटले जाते. मात्र सध्या चैत्र मास सुरू असूनही पारा 44 अंशांवर गेल्याने चैत्रातच वैशाख वणवा पेटल्याची स्थिती तयार झाली.

त्यामुळे मेमध्ये यंदा राज्याचे तापमान 45 ते 48 अंशावर जाईल, अशी भीती नागरिक व्यक्त करीत आहेत. सध्याची ही उष्णतेची लाट 18 ते 21 एप्रिलदरम्यान राहील, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हिमालयात पाऊस, मध्य भारतात उष्णतेची लाट
देशाच्या दोन भागांमध्ये विरुद्ध स्थिती तयार झाली आहे. हिमालयात 18 ते 21 एप्रिलदरम्यान पावसाचा अंदाज दिला आहे. त्या भागातील कमाल तापमान 3 ते 4 अंशांनी कमी होईल. तर मध्य भारतासह दक्षिणेतही उष्णतेची लाट सक्रिय झाली असून, पारा 44 अंशांवर गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *