महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १२ ऑगस्ट ।। जुलै महिन्यच्या तुलनेत ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राहूनही अधिक पर्जन्यमान उत्तर भारतामध्ये असेल असा प्राथमिक अंदाज केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. इथं राज्यात हातावर तुरी देऊन उत्तरेकडे मेहेरबान झालेल्या मान्सूनच्या वाऱ्यांमुळं हवेतील उष्मा वाढला असून आर्द्रतेत भर पडल्यामुळं तापमान प्रत्यक्षात दोन ते तीन अंश अधिक असल्याचं भासत आहे. ज्यामुळं पावसाळा असला तरीसुद्धा नागरिकांना उन्हाळ्यासम तयारीनिशी बाहेर पडण्याचं आवाहनसुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्रात फक्त विदर्भ, मराठवाड्यातच पाऊस?
राज्यातील पर्जन्यमानाचा विचार करायचा झाल्यस फक्त मराठवाडा आणि विदर्भातच पावसाची हजेरी असेल असं सांगत हवामान विभागानं या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. आंध्र प्रदेशपासून कर्नाटकच्या भागापर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होत असून, त्यामुळ बंगालच्या उपसागरात पुन्हा नव्यानं कमी दाबाच्या पट्ट्याची निर्मिती होत असून, 13 ऑगस्टपासून राज्यात पावसाची हजेरी पाहायला मिळेल असं सांगण्यात येत आहे.
मुंबई आणि कोकणात काय स्थिती?
मुंबई आणि कोकण क्षेत्रामध्ये पावसाच्या अधून मधून येणाऱ्या सरी वगळता कोकणातील अंतर्गत जिल्हे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात प्रामुख्यानं नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
खासगी हवामान संस्था स्कायमेटच्या अंदाजानुसार भारतासाठी हा संपूर्ण आठवडा पावसाचाच असेल. जिथं दिल्लीसह उत्तर भारतावर पावसाची कृपा, तर काही भागांमध्ये त्याची अवकृपासुद्धा पाहायला मिळणार आबहे. 14 ते 17 ऑगस्टदरम्यान मध्यम ते तुरळक स्वरुपातील पावसाच्या सरी महाराष्ट्रासह देशभरात हजेरी असेल असं सांगण्यात येत आहे. 18 ते 20 ऑगस्टदरम्यान मान्सूनचा आस असणारा पट्टा दक्षिणेकडे पुढे जाणार असून, त्यामुळं पावसाची तीव्रता आणि व्याप्ती कमी होणार आहे.
पुढील 24 तासांत देशाच्या जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राजस्थान, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगढ, आंध्र प्रदेश, ओडिशा, कर्नाटकचा किनारपच्ची भाग आणि गोव्यासह कोकणातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी असेल.