महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २८ सप्टेंबर | महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मराठवाडा, विदर्भात अतिवृष्टीमुळं पूरस्थिती उद्भवली आहे. तर सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळं पूराचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
बंगालच्या उपसागरातून पुढे सरकलेले कमी दाबाचे क्षेत्र सौराष्ट्राकडे जात आहे. हवामानातील या बदलाचा फटका महाराष्ट्र्राला बसतोय. रविवारी मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळं पूरस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
आज रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात रविवारी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक व छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांसह सातारा घाट व कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
राज्यातील सरासरी कमाल तापमान 25-28 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे, आयएमडीने कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी ‘रेड अलर्ट’ आणि इतर विभागांसाठी ‘ऑरेंज ते येलो अलर्ट’ जारी केले आहेत. मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील चार प्रमुख विभागांमध्ये 28 सप्टेंबर 2025 साठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सक्रिय मान्सून आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे क्षेत्रामुळे राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः मुंबई, रायगड, नाशिक आणि पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात अतिशय मुसळधार पाऊस (Extremely Heavy Rainfall) होण्याची शक्यता आहे. यामुळे या भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे, मराठवाडा आणि विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता असली तरी ती तुलनेने कमी तीव्रतेची आहे.
आज कुठे अलर्ट?
रेड अलर्ट
मुंबई, ठाणे,पालघर,रायगड पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्याचा परिसर
ऑरेंज अलर्ट
रत्नागिरी,सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर घाटमाथ्याचा परिसर
सोमवारी कुठे रेड अलर्ट
पालघर आणि नाशिकच्या घाटमाथ्याचा परिसर