महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ६ ऑक्टोबर | महायुती सरकारने बऱ्याच योजना सुरू केल्या. यातीलच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही सुपरहिट ठरली. काही योजना हिट ठरल्या. तर, काही फेल ठरल्या. आता महायुती सरकारने सुरू केलेली आणखी एक योजना जवळपास बंद पडण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारची शिवभोजन थाळी ही लोकप्रिय बंद पडण्याच्या मार्गावर असताना महायुती सरकारची ‘आनंदाचा शिधा’ ही योजना देखील बंद पडण्याच्या मार्गावर आहे.
‘आनंदाचा शिधा’ या योजनेला सुरूवातीला भरघोस प्रतिसाद मिळाला. या योजनेअंतर्गत दिवाळी तसेच इतर सणाला रेशनच्या दुकानात सामान्यांना किट मिळायचे. या किटद्वारे १ किलो चणा डाळ, साखर आणि १ लिटर खाद्यतेल, अशा ४-५ गोष्टी मिळतायेत. या गोष्टी अवघ्या १०० रूपयांत लाभार्थी व्यक्तींना मिळत असे. २०२४ साली महत्वाच्या सणाला सरकारतर्फे किटचं वितरण करण्यात आलं.
मात्र, यंदा गणेशोत्सव तसेच दिवाळीत राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा वितरीत केला गेला नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा ही योजना बंद होणार की काय? असा प्रश्न लाभार्थ्यांना पडला आहे. दिवाळीत आनंदाचा शिधाचे किट मिळेल, अशी शक्यता वाटत होती. मात्र, अद्याप तरी सरकारकडून आनंदाचा शिधाबाबत कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
आनंदाचा शिधा नेमकी योजना आहे तरी काय?
दसरा – दिवाळी या उत्सवांच्या काळात रेशनच्या दुकानांवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांना दिला जातो. पांढरे रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधाचे लाभ मिळत नाही. इतरांना १ किलो पाम तेल, चणा डाळ, रवा आणि साखर मिळते. फक्त १०० रूपयांत हे किट मिळते. ही योजना सुरू झाल्यानंतर अवघ्या ७२ लाख शिधापत्रकारांनी या योजनेचा लाभ घेतला.