✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३१ ऑक्टोबर २०२५ | जेमिमा रॉड्रीग्ज आणि हरमनप्रीत कौर यांच्या झंझावाती फटकेबाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियावर ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवत वर्ल्डकप २०२५ च्या अंतिम फेरीत धडक दिली आहे.
अटीतटीच्या या उपांत्य फेरीत भारताने वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरीत्या करत इतिहास रचला. आठ वर्षांनंतर महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा पराक्रम भारतीय महिलांनी केला आहे.
🏏 ऑस्ट्रेलियाची दमदार सुरुवात, पण भारताचा भेदक शेवट
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ३३८ धावांचा डोंगर उभारला. फिबी लिचीफिल्डने ९३ चेंडूत १७ चौकार आणि ३ षटकारांसह ११९ धावांची शानदार शतकी खेळी केली. एलिस पेरीने ७७, एश्ले गार्डनरने ६३ आणि बेथ मुनीने २४ धावा जोडल्या.
भारताकडून श्री चरणी आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या, तर क्रांती, अमनज्योत आणि राधा यांनी प्रत्येकी १-१ विकेट मिळवली. शेवटच्या षटकांत भारताच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाला आटोक्यात ठेवले.
🇮🇳 जेमिमा-हरमनप्रीतची ऐतिहासिक भागीदारी
३३९ धावांच्या आव्हानासमोर भारताची सुरुवात डळमळीत झाली. शफाली वर्मा (१०) आणि स्मृती मानधना (२४) लवकर बाद झाल्या. मात्र जेमिमा रॉड्रीग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी १६७ धावांची जबरदस्त भागीदारी रचत भारताला स्थिरावले.
हरमनप्रीतने ८८ चेंडूत ८९ धावा ठोकल्या, तर जेमिमाने १३४ चेंडूत १४ चौकारांसह १२७ नाबाद धावा झळकावल्या. शेवटी रिचा घोषने १६ चेंडूत २६ झटपट धावा करून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
भारताने ४८.३ षटकांत ५ बाद ३४१ धावा करत ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला. सामन्यानंतर जेमिमा, हरमनप्रीत आणि संपूर्ण संघाच्या डोळ्यात अश्रू दाटले — आनंदाचे, अभिमानाचे!
