देशावर नवं संकट! बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा धुमाकूळ; सोसाट्याचे वारे, मुसळधार पावसाचा इशारा — IMDचा तातडीचा अलर्ट

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ नोव्हेंबर २०२५ | गेल्या काही महिन्यांपासून एकामागोमाग एक नैसर्गिक आपत्तींचा फटका बसलेल्या देशावर पुन्हा संकटाचे सावट दाटले आहे. हिवाळ्याची चाहूल लागली असली तरी पावसाचे संकट मात्र अजूनही टळलेले नाही. मोंथा चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरात नवं चक्रीवादळ आकार घेत आहे, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिला आहे.

🌊 अंदमान आणि निकोबार बेटांवर अलर्ट जारी
पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात आणि म्यानमार किनाऱ्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, हे वादळ पुढील ४८ तासांत तीव्र चक्रीवादळात परिवर्तित होण्याची शक्यता आहे. IMDच्या माहितीनुसार, हे वादळ आता हळूहळू उत्तरेकडे आणि नंतर वायव्येकडे सरकणार आहे.

या चक्रीवादळाचा सर्वाधिक परिणाम अंदमान-निकोबार बेटांवर होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे तिथे प्रशासनाने हाय अलर्ट जारी केला आहे.

💨 ५५ किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे
IMDच्या अंदाजानुसार, उत्तर अंदमान समुद्रात वारे ताशी ५५ किलोमीटर वेगाने वाहतील. ४ नोव्हेंबरनंतर हे वादळ आणखी तीव्र होऊन समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील नागरिक, मच्छिमार आणि पर्यटकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

🚫 मच्छिमारांना समुद्रात जाण्यास मनाई
स्थानिक प्रशासनाने मच्छिमारांना पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा आदेश दिला आहे. तसेच किनाऱ्याजवळील भागात पर्यटकांची वर्दळ टाळण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

🌧️ ‘मोंथा’नंतर पुन्हा हवामान बिघडणार
अवघ्या काही दिवसांपूर्वी ‘मोंथा’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर हजेरी लावली होती. त्यात मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि ऊंच लाटा यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र सरकारच्या वेळीच घेतलेल्या खबरदारीमुळे मोठे नुकसान टळले होते.

आता बंगालच्या उपसागरातील या नव्या वादळामुळे देशात पुन्हा एकदा पावसाची तडाखेबाज परतफेड होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

⚠️ IMDचा इशारा स्पष्ट — पुढील काही दिवस हवामानातील चढउतारांसाठी तयार राहा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *