Maharashtra Weather News :नवा आठवडा, नवे अलर्ट! थंडी ओसरतेय, पण गारठा कायम; महाराष्ट्रात हवामानाचा गोंधळ

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक १५ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात थंडीने चांगलाच जोर धरला असतानाच नव्या आठवड्याच्या सुरुवातीला हवामानात बदलाची चिन्हं दिसत आहेत. उत्तर दिशेकडून आलेल्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांत राज्यभर गारठा जाणवत होता. मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवड्यात थंडीची तीव्रता काहीशी कमी होईल, तरीही गारवा कायम राहणार आहे. पुढील २४ तास राज्यासाठी अपवादात्मक असतील. या कालावधीत किमान तापमान १० ते १६ अंश, तर कमाल तापमान २२ ते २६ अंशांदरम्यान राहण्याची शक्यता आहे. किनारपट्टी भागात दुपारनंतर आर्द्रता वाढलेली जाणवेल.

कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील २४ तास कोरड्या हवामानाचे राहणार आहेत. मुंबईत किमान २० तर कमाल ३३ अंश तापमान नोंदवले जाऊ शकते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि घाटमाथ्यावर सकाळी गारठा व काही भागात धुक्याची चादर दिसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी येथे निरभ्र आकाश आणि कोरडे हवामान राहील. मात्र विदर्भात थंडीचा कडाका अधिक जाणवेल. अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया परिसरात किमान तापमानात मोठी घट नोंदवली जाण्याची शक्यता आहे. धुळे येथे पारा ६ अंशांपर्यंत घसरला असून, पुढील २४ तासांत तो ८ अंशांपर्यंत वाढू शकतो.

देशपातळीवर पाहता, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू-काश्मीरच्या पर्वतीय भागात तुरळक हिमवृष्टीचा अंदाज आहे. दक्षिण भारतातही शीतलहरींचा प्रभाव वाढत असून तेलंगणा आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांसाठी थंडीचा इशारा देण्यात आला आहे. केरळ आणि तामिळनाडूमध्ये हलक्या पावसाच्या सरींची शक्यता असली तरी हवेत गारवा जाणवेल. एकूणच, थंडीची तीव्रता कमी होत असली तरी हवामानातील चढ-उतार नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *