३ तासांची स्वप्नयात्रा थांबली! चेक क्लिअर होणार झटपट म्हणे… पण आरबीआयने ऐनवेळी ब्रेक लावला

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दिनांक : २५ डिसेंबर २०२५ | “चेक दिला आणि तीन तासांत पैसे खात्यात!” — ही कल्पनाच बँक ग्राहकांना स्वप्नवत वाटत होती. १ जानेवारी २०२६ पासून हीच व्यवस्था लागू होणार, अशी चर्चा रंगली होती. पण नेहमीप्रमाणे वास्तवाने स्वप्नाला हलकासा धक्का दिला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ऐनवेळी मोठा निर्णय घेत चेक क्लिअरन्सच्या ‘सुपरफास्ट’ टप्प्याला तात्पुरती स्थगिती दिली आहे. म्हणजे काय, तर तीन तासांत पैसे मिळण्याचं स्वप्न… अजून थोडं लांबणीवर!

२४ डिसेंबर रोजी आरबीआयने एक परिपत्रक काढत स्पष्ट केलं की, ‘चेक ट्रंकेशन सिस्टम’मधील दुसरा टप्पा (फेज-२) सध्या लागू केला जाणार नाही. हा टप्पा ३ जानेवारी २०२६ पासून अमलात येणार होता. या नियमानुसार, बँकेला चेकची डिजिटल प्रत मिळाल्यानंतर अवघ्या ३ तासांत तो मंजूर किंवा नामंजूर करणे बंधनकारक असणार होते. वेळेत उत्तर न दिल्यास चेक आपोआप मंजूर मानला जाणार होता. थोडक्यात, बँक झोपली तर ग्राहक जागा! पण तांत्रिक तयारी आणि प्रणालीच्या स्थिरतेचा विचार करता आरबीआयने “थांबा जरा” असा इशारा दिला आहे.

मात्र याचा अर्थ असा नाही की सगळंच मागे गेलं. कारण पहिला टप्पा (फेज-१) आधीच लागू आहे आणि तो सुरूच राहणार आहे. ४ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झालेल्या या व्यवस्थेमुळे चेक क्लिअरिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. आता चेक प्रत्यक्ष फिरत नाही; त्याची स्कॅन कॉपी आणि MICR डेटावरच व्यवहार होतो. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत चेक सादर करता येतो आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तो मंजूर किंवा नामंजूर करावा लागतो. नाहीतर? मग तो मंजूरच मानला जातो!

याचा थेट फायदा असा की, पूर्वी जिथे २–३ दिवस लागत होते, तिथे आता एकाच दिवसात चेक क्लिअर होतो.  सांगायचं तर—“घोडं अजून धावत नाहीये, पण चालायचं शिकून झालंय!”

ग्राहकांसाठी निष्कर्ष सोपा आहे. तीन तासांत पैसे मिळणार नाहीत, हे खरं; पण दिवसन्‌दिवस वाट पाहण्याचा काळ संपलाय, हेही तितकंच खरं. आरबीआय लवकरच दुसऱ्या टप्प्याची नवी तारीख जाहीर करेल, अशी शक्यता आहे. तोपर्यंत एवढंच म्हणावं लागेल—चेक दिला की पैसे येतात, फक्त ‘क्षणात’ नाही… ‘आजच’!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *