Pune Jaggery Prices: तिळगुळ गोड, पण भाव कडू! संक्रांती आली अन् बाजारानं कात्री लावली

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. २९ डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात सण आला की देव खुश, माणूस उत्साही आणि बाजार मात्र अलर्ट मोडवर जातो. संक्रांती जवळ आली की तिळगुळाने “गोड गोड बोला” म्हणायच्या आधीच बाजार म्हणतो—“आधी भाव ऐका!” पुण्याच्या घाऊक बाजारात सध्या हेच चित्र दिसतंय.

संक्रांतीमुळे गुळाची मागणी वाढली आणि नेहमीप्रमाणे आवक कमी झाली. मग काय, गुळाने थेट भाववाढीची उडी घेतली. हलक्या आणि मध्यम प्रतीच्या गुळात क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांची वाढ झाली, तर पॅकिंगमधील गुळाने तर थेट २०० ते ३०० रुपयांनी उडी मारली. म्हणजे तिळगुळ घ्यायचा तर भावही गिळावा लागतोय!

आजकाल संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ वाटप नाही, तर पाव किलो, अर्धा किलो, एक किलोच्या पॅकिंगचा खेळ. “लहान पॅक, मोठा भाव” हे बाजाराचं नवं सूत्र दिसतंय. गुळ एक्स्ट्रा ४६०० ते ४७५०, तर चिक्की गुळ तर ६ हजारांपर्यंत पोहोचला. म्हणजे चिक्की खाताना दातांपेक्षा आधी खिशाची परीक्षा!

खाद्यतेलांनीही संधी सोडली नाही. १५ किलो किंवा लिटरच्या डब्यामागे ३० ते ४० रुपयांची वाढ. शेंगदाणा तेल, रिफाईंड, सोयाबीन, सूर्यफूल—सगळ्यांनी भाव वाढवून गृहिणींना सांगितलंय, “फोडणी जपून!”तेल महाग, गॅस महाग, आणि म्हणे स्वयंपाक स्वस्त हवा!

मात्र या सगळ्या महागाईच्या गर्दीत एक दिलासादायक बातमी आहे—साखर स्वस्त झाली!केंद्र सरकारनं जानेवारीचा साखरेचा कोटा खुला केल्यानं पुरवठा मुबलक झाला आणि मागणी कमी. परिणामी साखरेचे दर क्विंटलमागे आणखी ५० रुपयांनी घसरले. एस-३० साखर ३९५० ते ४००० रुपये. म्हणजे चहात साखर घालायला तरी मन मोकळं!

नव्या नारळाचंही तेच. आवक वाढली, पण उठाव नाही. त्यामुळे दर शेकड्यामागे १०० रुपयांनी खाली. मात्र मद्रास आणि पालकोल नारळ मात्र आपली शान राखून आहेत—त्यांची तेजी कायम!

थोडक्यात काय, संक्रांतीनं बाजाराला उब दिली असली, तरी ग्राहकाला मात्र घाम फुटतोय. गुळ महाग, तेल महाग, पण साखर स्वस्त—म्हणजे तोंड गोड ठेवायला साखर आहे, पण तिळगुळासाठी खिसा हलका करावा लागणार.

शेवटी संक्रांतीचं तत्वज्ञान बाजारही पाळतोय—“तिळगुळ घ्या, गोड बोला… पण भाव विचारल्यावर गप्प बसा!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *