Today Temprature : “राज्यात शेकोट्यांना सुगी, स्वेटरांना सुट्टी नाही! महाराष्ट्र पुन्हा गारठला”

Spread the love

Loading

✍️ महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ३० डिसेंबर २०२५ | महाराष्ट्रात सध्या राजकारणापेक्षा जास्त चर्चा जर कशाची असेल, तर ती म्हणजे थंडीची. डिसेंबर संपता संपता थंडीने असा काही कडाका वाढवला आहे की, अनेक ठिकाणी सकाळी उठण्यापेक्षा शेकोटीजवळ बसणे अधिक सोयीचे वाटू लागले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी लोक फटाक्यांची तयारी करत असताना, निसर्गाने मात्र थेट गार वाऱ्यांची आतषबाजी सुरू केली आहे.

राज्यातील किमान तापमानात लक्षणीय घट झाली असून, अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. परभणी येथे तब्बल ६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, निफाड (७.३), अहिल्यानगर (७.७), धुळे (७.८) ही ठिकाणेही थंडीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. गोंदिया, नाशिक, नागपूर, यवतमाळ, बुलडाणा यांसारख्या जिल्ह्यांतही गुलाबी थंडीने नागरिकांना चांगलेच हुडहुडी भरवली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंशांची आणखी घट होण्याची शक्यता आहे. म्हणजे थंडीने अजून बॅग भरलेलीच असून, “आलोच आहे” असा स्पष्ट इशारा तिने दिला आहे. पहाटेच्या वेळी काही भागांत धुके आणि दव पडत असल्याने वाहनचालकांनाही अधिक सावध राहावे लागत आहे.

पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर यांसारख्या भागांत किमान तापमान १० ते ११ अंशांच्या आसपास स्थिरावले आहे. तर कोकण किनारपट्टीवर थंडीचा प्रभाव तुलनेने कमी असला, तरी मुंबई, रत्नागिरी, डहाणू येथेही थंड हवामान जाणवत आहे. सांताक्रूझ येथे १७ अंश तापमानाची नोंद झाली आहे.

एकीकडे शेतकरी पिकांसाठी थंडी फायदेशीर ठरेल का, याचा हिशेब मांडत आहेत, तर दुसरीकडे सामान्य नागरिक स्वेटर, मफलर आणि शेकोटी यांच्या भरोशावर दिवस काढताना दिसत आहेत. थोडक्यात काय, तर पावसाप्रमाणेच थंडीचाही मुक्काम लांबणार असून, जानेवारी महिना चांगलाच गारठवणारा ठरणार आहे.

“राज्यात सध्या राजकीय तापमान कमी असले, तरी हवामानाचं तापमान मात्र सरकारला विचारून अजिबात वागत नाही!” 😄

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *