महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. १० फेब्रुवारी २०२६ || दिल्लीच्या राजकीय वर्तुळात अचानक हालचाली वाढल्या आणि त्याचे पडसाद थेट महाराष्ट्रात उमटले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अचानक दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी होणारी भेट यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे या दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, अधिकृत कार्यक्रम किंवा ठोस अजेंडा जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार, ही भेट केवळ औपचारिक नसून राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी, सत्तासमीकरणं आणि येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. दिल्लीतील या भेटीकडे सत्ताधारी आणि विरोधक दोघांच्याही नजरा लागल्या असून, “दिल्लीमध्ये काहीतरी शिजत आहे” अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर निर्माण झालेल्या राज्यसभेच्या रिक्त जागेवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यसभेची ही जागा कोणाला मिळणार, कोणाचा दिल्लीतील प्रवेश होणार, यावरून सत्ताधारी आघाडीतही उत्सुकता आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांनाही पुन्हा वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय हालचाली, नेत्यांचे गुप्त भेटीगाठी आणि वक्तव्यांमुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दिल्लीतील या भेटीत राज्यातील सध्याची राजकीय स्थिती, पक्षांतर्गत समन्वय, तसेच आगामी निवडणुकांसाठीची रणनीती यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे निकालही या चर्चेचा महत्त्वाचा भाग ठरू शकतात. या निवडणुकांमध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले असून, महायुतीने ग्रामीण भागातही आपली पकड मजबूत केल्याचं चित्र आहे. या यशाची माहिती केंद्रीय नेतृत्वाला देण्यासोबतच, पुढील राजकीय दिशा ठरवण्यावरही भर दिला जाऊ शकतो. दुसरीकडे, या दिल्ली दौऱ्यामागे राजकीय हेतू नाही, असा दावा काही नेत्यांकडून करण्यात येत असला तरी, वेळ, गुप्तता आणि पार्श्वभूमी पाहता या भेटीचं महत्त्व कमी लेखता येणार नाही. दिल्लीतील बंद दाराआड होणाऱ्या चर्चांचे परिणाम लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतील, अशी शक्यता व्यक्त होत असून, पुढील काही दिवस राज्याच्या राजकीय घडामोडींसाठी निर्णायक ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
