![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३१ मार्च २०२६ ।। पुणेकरांसाठी वाहतुकीच्या कोंडीतून सुटकेची मोठी बातमी समोर आली आहे. पुणे-नाशिक महामार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला अखेर गती मिळाली असून, येत्या काळात हा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. सततच्या ट्रॅफिकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी हा प्रकल्प दिलासादायक ठरणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारला जाणारा हा प्रकल्प केवळ रस्ता विस्तार नाही, तर संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा कायापालट करणारा ठरणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत सिंगल पिलर तंत्रज्ञानावर आधारित ८ पदरी उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे, तर सध्याचा रस्ता ६ पदरी करण्यात येईल. त्यामुळे संपूर्ण महामार्ग तब्बल १४ लेनचा होणार असून वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, अशी अपेक्षा आहे. विशेष म्हणजे, स्थानिक वाहतूक आणि जड वाहनांसाठी स्वतंत्र लेनची सुविधा दिली जाणार आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत होईल. रोजच्या प्रवासात वेळ वाचणार, ही या प्रकल्पाची सर्वात मोठी जमेची बाजू ठरणार आहे.
या महामार्गामुळे भोसरी, चाकण, मोशी आणि खेड या औद्योगिक पट्ट्यांना थेट आणि जलद कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. हजारो कामगार, उद्योजक आणि वाहतूकदार यांना याचा मोठा फायदा होईल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवला जाणारा हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी चालना देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. एकूणच, पुणे-नाशिक प्रवास आता केवळ सोपा नाही, तर ‘सुपरफास्ट’ होणार आहे.
