![]()
✍️ महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ एप्रिल २०२६ ।। सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरांनी पुन्हा एकदा झळाळी घेतली असून बाजारात चांगलीच उसळी पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार अनुभवत असलेल्या सोन्याने आता वाढीचा मार्ग धरला आहे. अवघ्या २४ तासांत दरात वाढ नोंदली गेली असून, जीएसटीसह सोन्याची किंमत तब्बल १,५७,५९० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. चांदीनेही मागे न राहता जोरदार उसळी घेतली असून ती प्रति किलो २,६३,६८० रुपयांवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच १.४० लाखांच्या आसपास असलेले दर आता दीड लाखांच्या पुढे गेले असल्याने ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे. लग्नसराईचा हंगाम आणि सणासुदीची चाहूल यामुळे बाजारात मागणी वाढत असली तरी वाढत्या किंमतींमुळे खरेदीदार मात्र संभ्रमात आहेत.
अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून या दिवशी सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही सोन्याच्या खरेदीला उधाण येण्याची शक्यता होती. मात्र, यंदा वाढलेल्या दरांनी ग्राहकांची पावले जड झाली आहेत. अनेकजण ‘आता खरेदी करावी की थांबावे?’ या द्विधा मनःस्थितीत अडकले आहेत. सराफा बाजारातही याचा परिणाम दिसून येत असून ग्राहकांची गर्दी अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरवाढीमागे जागतिक घडामोडींचा मोठा प्रभाव असल्याचे तज्ज्ञ सांगतात. विशेषतः अमेरिका-इराण तणाव, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जात आहे. परिणामी मागणी वाढून दरात वाढ होत आहे. त्यातच सणासुदीचा हंगाम असल्याने मागणीला अधिक चालना मिळत आहे. एकूणच, सोन्याचा बाजार सध्या ‘तेजी’मध्ये असला तरी सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही वाढती किंमत चिंतेचा विषय ठरत आहे.
