महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ०७ मे २०२६ ।।कोलकाता/चेन्नई : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागताच देशाच्या राजकारणात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. पूर्व भारतात पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप सत्ता स्थापनेच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, ९ मे रोजी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अनेक वर्षांच्या राजकीय संघर्षानंतर बंगालमध्ये कमळ फुलल्याची चर्चा रंगू लागली असून, आता सर्वांचे लक्ष नव्या मुख्यमंत्र्याच्या नावाकडे लागले आहे. भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची महत्त्वाची बैठक ८ मे रोजी होणार असून, त्यात नेतृत्वावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षातील अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने बंगालमधील सत्तांतर राष्ट्रीय चर्चेचा विषय बनला आहे. निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय वातावरण आधीच तापलेले असताना हिंसाचाराच्या घटनांनीही चिंता वाढवली आहे. अशातच भाजप नेते सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेने परिस्थिती आणखी संवेदनशील बनली आहे. त्यामुळे बंगालमध्ये सत्ता बदलासोबतच कायदा-सुव्यवस्थेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे.
दुसरीकडे, दक्षिण भारतात तामिळनाडूच्या राजकारणानेही नवा ट्विस्ट घेतला आहे. टीव्हीके प्रमुख आणि अभिनेता थलपती विजय यांना काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर राज्यातील समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. विजय यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा सादर केल्याने तामिळनाडूमध्ये नव्या राजकीय अध्यायाची सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. चित्रपटसृष्टीतून राजकारणात आलेल्या विजय यांच्या या मोठ्या राजकीय चालीमुळे दक्षिणेतील पारंपरिक पक्षांमध्येही खळबळ उडाली आहे. बंगाल ते तामिळनाडू या दोन राज्यांतील बदलत्या घडामोडींमुळे देशाच्या राजकीय पटावर नवे समीकरण आकार घेत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
