समर्पणाच्या तेजाने उजळला मानवतेचा मार्ग

Spread the love

Loading

महाराष्ट्र्र 24 : ऑनलाईन : पिंपरी-चिंचवड, दि. १२ मे २०२६ : आजच्या स्वार्थाच्या बाजारात माणुसकीचे मोल पैशाच्या काट्यावर तोलले जात असताना, काही महान आत्मे आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास मानवतेच्या चरणी अर्पण करून जातात आणि म्हणूनच त्यांची स्मृती ही केवळ छायाचित्रांत बंदिस्त राहत नाही, तर ती जनमानसाच्या हृदयावर कोरली जाते. अशाच प्रेम, करुणा आणि आत्मज्ञानाच्या अखंड ज्योतीचे प्रतीक ठरलेल्या युगद्रष्टा बाबा हरदेव सिंहजी यांच्या पावन स्मृतीस अर्पित ‘समर्पण दिवस’ बुधवार, दि. १३ मे २०२६ रोजी हरियाणातील समालखा येथील संत निरंकारी आध्यात्मिक स्थळी अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा होणार आहे. सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज तथा श्रद्धेय निरंकारी राजपिताजी यांच्या पावन सान्निध्यात होणारा हा कार्यक्रम श्रद्धा, भक्ती आणि समर्पणाचा महासागर ठरणार आहे. देश-विदेशातून हजारो श्रद्धाळू या प्रसंगी उपस्थित राहून बाबाजींना कृतज्ञतेची मानवंदना अर्पण करणार आहेत. कार्यक्रमानंतर सतगुरु माताजींचे आशीर्वचन ऐकण्याची संधी लाभणार असल्याने भक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करत या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही करण्यात येणार असून जगभरातील श्रद्धाळूंना या आध्यात्मिक पर्वाचा लाभ घेता येणार आहे.

बाबा हरदेव सिंहजी हे केवळ एका धार्मिक संस्थेचे प्रमुख नव्हते; ते माणसाच्या मनातील कटुता वितळवणारे प्रेमाचे झरे होते. त्यांच्या चेहऱ्यावरील सहज हास्य, शब्दांतील माधुर्य आणि वागण्यातली विलक्षण नम्रता यामुळे लाखो लोकांना आत्मिक शांततेचा अनुभव लाभला. “मानव सेवा हीच ईश्वरभक्ती” हा त्यांचा संदेश केवळ व्यासपीठावरचा नारा नव्हता, तर तो त्यांच्या जीवनाचा प्राण होता. म्हणूनच संत निरंकारी मिशनने रक्तदान शिबिरे, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य सेवा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांना सकारात्मक दिशा देणारे उपक्रम राबवत समाजसेवेचा नवा आदर्श निर्माण केला. धर्माच्या नावाखाली भिंती उभारणाऱ्या काळात बाबाजींनी प्रेम, सहअस्तित्व आणि विश्वबंधुत्वाचा पूल बांधला. आत्मज्ञानाच्या प्रकाशातून त्यांनी समाजाला सांगितले की, माणसाला माणूस म्हणून स्वीकारले तरच जगात खरी शांती नांदेल. त्यांच्या विचारांनी लाखो कुटुंबांमध्ये आशेचा दिवा पेटवला आणि जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली.

सुमारे छत्तीस वर्षे संत निरंकारी मिशनचे नेतृत्व करताना बाबा हरदेव सिंहजी यांनी मिशनला जागतिक स्तरावर नवे वैभव प्राप्त करून दिले. आज ६७ हून अधिक देशांमध्ये मिशन मानवतेचा, नैतिकतेचा आणि आध्यात्मिक जागृतीचा संदेश प्रभावीपणे पोहोचवत आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सामाजिक व आर्थिक परिषदेच्या सल्लागार संस्थेचा सन्मान मिळवणाऱ्या या मिशनमागे बाबाजींची दूरदृष्टी, त्याग आणि अथक तपश्चर्या होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील सुमारे १७ ठिकाणी सायंकाळी साडेसहा ते नऊ या वेळेत ‘समर्पण दिवस’ कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संत निरंकारी मंडळाने दिली आहे. सध्या सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज त्याच दिव्य परंपरेची पताका समर्थपणे पुढे नेत असून प्रेम, सेवा, संयम आणि आत्मबोधाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवत आहेत. ‘समर्पण दिवस’ हा केवळ श्रद्धांजलीचा सोहळा नाही; तो माणुसकीच्या मंदिरात प्रज्वलित झालेल्या त्या अखंड दिव्याची आठवण आहे, जो आजही मानवतेचा मार्ग प्रकाशमान करीत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *