![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १३ मे २०२६ ।।भारतातील सर्वसामान्य माणसाचं आयुष्य म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार येतो आणि दहाव्या तारखेपर्यंत महागाई त्याला नमस्कार करून निघून जाते! आता एप्रिल महिन्यातील किरकोळ महागाईच्या आकडेवारीने पुन्हा एकदा जनतेच्या कपाळावर आठ्या वाढवल्या आहेत. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्चमधील ३.४० टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ३.४८ टक्क्यांवर पोहोचला आहे. आकडा पाहायला छोटा वाटला, तरी बाजारात भाज्या, दागिने आणि रोजच्या गरजेच्या वस्तूंचे भाव ऐकले की खिशातल्या नोटांनाही घाम फुटू लागतो. विशेष म्हणजे चांदीच्या दागिन्यांच्या किमतींमध्ये तब्बल १४४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. म्हणजे आधी “सोनं महाग” म्हणून चांदीकडे वळणाऱ्या ग्राहकांनाही आता सराफाच्या दुकानात जाऊन फक्त काचेपलीकडूनच चमक पाहावी लागणार आहे. टोमॅटोनेही आपला जुना “लालभडक” स्वभाव कायम ठेवत तब्बल ३५ टक्क्यांनी उडी घेतली आहे. भारतीय स्वयंपाकघरात टोमॅटोचे दर वाढले की गृहिणींच्या चेहऱ्यावरची चिंता आणि नवऱ्याच्या ताटातील रस्सा दोन्ही कमी होत जातात, हे आता कायमचंच चित्र बनलं आहे.
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार, नारळ-सुके खोबरे, सोने-हिरे-प्लॅटिनमचे दागिने आणि अन्नधान्य यांच्या किमतींनी महागाईला अधिक खतपाणी घातलं आहे. अन्नधान्याची महागाई मार्चमधील ३.८७ टक्क्यांवरून एप्रिलमध्ये ४.२० टक्क्यांवर गेली आहे. दुसरीकडे बटाटा, कांदा आणि काही वाहनांच्या किमतींमध्ये घट झाली असली, तरी सामान्य माणसाला बाजारात “स्वस्ताई”चा अनुभव अजूनही मिळालेला नाही. Reserve Bank of India ने २०२६-२७ साठी महागाईचा अंदाज ४.६ टक्के वर्तवला असून, पश्चिम आशियातील संघर्ष, वाढती इंधन महागाई आणि संभाव्य ‘एल निनो’ यामुळे पुढील काळ अधिक कठीण होऊ शकतो, असा इशाराही दिला आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, सध्या वाढलेल्या ऊर्जा आणि कच्च्या मालाच्या किमतींचा पूर्ण भार ग्राहकांवर पडलेला नाही. पण पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, तर त्याचे परिणाम थेट घरगुती बजेटपासून उद्योगधंद्यांपर्यंत सर्वत्र जाणवतील. कारण भारतात पेट्रोल महागलं की फक्त वाहनचालकच नाही, तर टोमॅटोपासून टॅक्सीपर्यंत सगळंच महाग होतं.
दरम्यान, उष्णतेच्या लाटा आणि ‘एल निनो’च्या शक्यतेमुळे कृषी उत्पादनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सरकारने सध्या पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवून इंधन महागाई काही प्रमाणात रोखली आहे; पण जागतिक परिस्थिती बिघडली, तर हा ताण जास्त काळ झेलणं कठीण ठरू शकतं. अर्थतज्ज्ञ धर्मकीर्ती जोशी यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. महागाई हा असा पाहुणा आहे की, तो घरात आला की सर्वप्रथम स्वयंपाकघरावर कब्जा करतो आणि नंतर हळूहळू संपूर्ण घराची आर्थिक शिस्त बिघडवतो. आज सोनं, चांदी आणि अन्नधान्य महागलं आहे; उद्या पेट्रोलचे दर वाढले, तर सर्वसामान्यांच्या जीवनाचा हिशोब आणखीच कोलमडू शकतो. त्यामुळे सरकार, रिझर्व्ह बँक आणि अर्थतज्ज्ञ यांच्याइतकंच आता सामान्य माणूसही दररोज बाजारात जाऊन “आज काय वाढलं?” याचं अर्थशास्त्र शिकू लागला आहे.
