![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १४ मे २०२६ ।। चार दिवस… अवघे शहाण्णव तास! पण या शहाण्णव तासांनी सामान्य माणसाच्या संसाराच्या वहीत असा लाल शाईचा हिशेब लिहिला की, बघणाऱ्याचं डोकंच फिरावं. कालपर्यंत ज्या घरात दूध, पेट्रोल, गॅस, सोने-चांदी हे शब्द केवळ बाजारभावाच्या चर्चेत होते, तिथे आज ते थेट धडकी भरवणारे विषय झाले आहेत. बाजारात भाव वाढण्याचा वेग असा सुटला आहे की, कांद्याच्या सालीसारखा पगार हातात येण्याआधीच निघून जातोय. सोन्याच्या दुकानात ग्राहकांचे चेहरे पडलेले, दूधाच्या बूथवर गृहिणींच्या कपाळावर आठ्या आणि पेट्रोलपंपावर वाहनधारकांच्या तोंडून उसासे — हेच आजच्या अर्थव्यवस्थेचं खरं चित्र बनलं आहे. सरकारच्या आर्थिक धोरणांपासून इराणमधील तणावापर्यंत प्रत्येक गोष्ट आता थेट स्वयंपाकघरात शिरली आहे. सामान्य माणूस फक्त बातम्या ऐकत नाही; तो दररोज स्वतःच्या खिशात महागाईचा चटका अनुभवतो आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संयमाचा सल्ला दिला आहे. पेट्रोलियमचा वापर कमी करा, सोन्याची खरेदी टाळा, कंपन्यांनी पुन्हा ‘वर्क फ्रॉम होम’ स्वीकारावं, खतांचा वापर अर्ध्यावर आणावा आणि परदेशवारीऐवजी देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य द्यावं — अशी आवाहनांची मालिका त्यांनी केली. पण सामान्य माणसाला आता प्रश्न पडला आहे की, “काय कमी करायचं आणि किती कमी करायचं?” आधीच हात आखडता घेत जगणाऱ्या नागरिकाने आता श्वासही मोजून घ्यायचा का? सरकारने सोन्या-चांदीवरील आयात शुल्क थेट १५ टक्क्यांवर नेल्याने सोन्याचे दर एका दिवसात तब्बल नऊ ते अकरा हजारांनी उसळले. चांदीनेही उडी घेतली. लग्नसराईच्या तोंडावर मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांवर अक्षरशः करवत फिरली आहे. दुसरीकडे अमूल आणि मदर डेअरीने दूध दरवाढ जाहीर केली. दोन रुपयांची वाढ कागदावर छोटी दिसते; पण महिन्याच्या शेवटी तीच वाढ संसाराच्या हिशेबात मोठ्ठं भगदाड पाडते.
यात भर म्हणजे रुपयाची ऐतिहासिक घसरण! डॉलरसमोर रुपया ९५.७० वर घसरल्याने अर्थव्यवस्थेच्या पाया हलल्याची चर्चा सुरू झाली आहे. महागाईचा दर ३.४८ टक्क्यांवर पोहोचला असला तरी बाजारात नागरिकांना तो दहा टक्क्यांपेक्षा कमी वाटत नाही. भाज्या, धान्य, दूध, इंधन — प्रत्येक वस्तूने ‘महागाई एक्सप्रेस’ पकडली आहे. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनीही स्पष्ट संकेत दिले की, इराण संकट लांबल्यास पेट्रोल-डिझेल दरवाढ अटळ ठरू शकते. म्हणजे उद्या गाडी चालवणंही श्रीमंतीचं लक्षण ठरेल की काय, अशी भीती आता लोकांना वाटू लागली आहे. एकीकडे सरकार संयम शिकवतंय आणि दुसरीकडे बाजार सामान्य माणसाचा संयम संपवत आहे. महागाईच्या या वादळात सर्वसामान्य माणूस आज पुन्हा एकदा एकटाच उभा आहे — हातात रिकामं पाकीट आणि डोळ्यांत वाढत्या खर्चाची काळजी घेऊन!
