![]()
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १८ मे २०२६ ।। जळगावच्या सुवर्णनगरीत सध्या सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये ग्राहकांपेक्षा चर्चांचाच जास्त राबता दिसतो आहे. कारण केंद्र सरकारने घेतलेल्या एका निर्णयाने सराफा बाजाराचे अक्षरशः धाबे दणाणले आहेत. सरकारने चांदीची आयात ‘मुक्त श्रेणी’तून थेट ‘मर्यादित श्रेणी’त टाकत बाजाराला मोठा झटका दिला आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांना हवी तशी चांदी आयात करता येत होती; पण आता सरकारी परवानगीशिवाय चांदीचा कणही देशात आणणे कठीण होणार आहे. त्यात आधीच आयात शुल्क वाढवलेले असल्याने बाजारातील व्यापारी म्हणू लागले आहेत — “सरकारने चांदीला अक्षरशः सोन्याची किंमत आणून ठेवली!” या निर्णयानंतर देशभरातील सराफा बाजारात खळबळ उडाली असून, जळगावसारख्या सुवर्ण बाजारपेठेत तर व्यापाऱ्यांच्या कपाळावर आठ्या आणि गुंतवणूकदारांच्या डोळ्यांत चमक दोन्ही एकाच वेळी दिसत आहेत.
सध्या जळगावच्या बाजारात सोन्याने दीड लाखांचा टप्पा ओलांडून तब्बल एक लाख त्रेचाळीस नव्हे, तर जीएसटीसह तब्बल एक लाख त्रेसष्ट हजार रुपये प्रति तोळ्याचा दर गाठला आहे. चांदीने तर दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये प्रतिकिलोचा आकडा पार करत बाजारात थरार निर्माण केला आहे. पूर्वी घरात चांदीचे भांडे ठेवणारे लोक आता ती बँकेच्या लॉकरमध्ये ठेवण्याचा विचार करत आहेत. कारण बाजारात निर्माण होणाऱ्या संभाव्य तुटवड्यामुळे भाव आणखी उसळी घेतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. चांदी ही फक्त दागिन्यांची गोष्ट राहिलेली नाही; इलेक्ट्रॉनिक्स, सोलर उद्योग, वैद्यकीय उपकरणे अशा अनेक क्षेत्रांत तिचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. त्यामुळे सरकारच्या या एका निर्णयाने फक्त सराफा बाजारच नव्हे, तर उद्योगविश्वाचेही गणित बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
सरकारचा हेतू काय, हा प्रश्न आता सर्वसामान्यांपासून मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या चर्चेचा विषय ठरला आहे. काही जाणकारांच्या मते, परदेशातून होणारी मोठ्या प्रमाणातील आयात कमी करून देशांतर्गत बाजार नियंत्रित ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. तर काहींचे म्हणणे आहे की, वाढत्या आयातीमुळे परकीय चलनावर येणारा ताण कमी करण्यासाठी हा डाव टाकण्यात आला आहे. पण सामान्य माणसाला अर्थकारणापेक्षा एकच गोष्ट समजते — “आज घेतली नाही तर उद्या चांदी आणखी महागणार!” त्यामुळे बाजारात सध्या उत्सुकता, भीती आणि सट्टेबाजी यांचे अनोखे मिश्रण तयार झाले आहे. सरकारचा निर्णय दीर्घकालीन ठरणार असल्याने पुढच्या काही महिन्यांत सोन्या-चांदीच्या भावांचा आलेख आणखी उंच झेपावला, तर आश्चर्य वाटायला नको.
