![]()
पिंपरीतील मृत्यूंच्या साखळीचा धागा भिवंडीत; हजारो किलो मिथेनॉल जप्त, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ३० मे २०२६ ।। Pune Hooch Tragedy Connection : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २२ निष्पाप जीव गिळंकृत करणाऱ्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असताना, या मृत्यूंच्या मागचे खरे सूत्र अखेर उलगडू लागले आहे. काही हजार रुपयांच्या नफ्यासाठी मानवी आयुष्याचा बाजार मांडणाऱ्या टोळीचा धागा थेट भिवंडीपर्यंत पोहोचल्याचे उघड झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासात विषारी दारू बनवण्यासाठी वापरण्यात आलेल्या मिथेनॉलचा मोठा साठा भिवंडीतील एका गोदामातून पुरवला गेल्याचे समोर आले. या धक्कादायक खुलाशानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई करत तब्बल ५,९२९ किलो मिथेनॉल जप्त केला. मृत्यूच्या या साखळीमागे फक्त काही आरोपी नव्हते, तर बेकायदेशीर पुरवठा, बेफिकीर यंत्रणा आणि नफ्याच्या हव्यासाचे संपूर्ण जाळे कार्यरत असल्याचे चित्र आता स्पष्ट होत आहे.
भिवंडीतील ‘रेक्स इंटरनॅशनल’ या कंपनीच्या गोदामावर टाकलेल्या छाप्यात हा साठा सापडला. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणातील घातक रसायनाची अधिकृत नोंदच उपलब्ध नव्हती. म्हणजेच कागदोपत्री अस्तित्व नसलेला माल प्रत्यक्षात बाजारात फिरत होता. तपास अधिक खोलात गेल्यानंतर मिथेनॉलचा हा साठा विविध मध्यस्थांमार्फत पुणे परिसरात पोहोचल्याचे समोर आले. आरोपींनी गावठी दारूमध्ये हे रसायन मिसळून तिचे प्रमाण वाढवले आणि अधिक नफा कमावला. पण हा नफा अनेक कुटुंबांच्या आयुष्यावर काळा पडदा टाकणारा ठरला. काहींनी दृष्टी गमावली, काहींच्या किडन्या निकामी झाल्या आणि अनेकांना मृत्यूने कवेत घेतले. एका बाजूला पैशांचा हिशेब मांडला जात होता, तर दुसऱ्या बाजूला मृतदेहांची संख्या वाढत होती.
या संपूर्ण प्रकरणात प्रशासनाची हालचाल विशेष लक्षवेधी ठरली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांत राज्यभर धाडी आणि तपास मोहिमा सुरू केल्या. त्यांच्या निर्देशानंतर विविध विभागांनी एकाच वेळी कारवाया करत संशयास्पद साठे जप्त केले. ठाणे जिल्ह्यातही लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून अनेक आरोपींना अटक करण्यात आली आहे. जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवायांमधून देण्यात आला आहे.
मात्र या घटनेने एक गंभीर प्रश्न पुन्हा समोर आणला आहे. विषारी दारू तयार होत होती, विकली जात होती आणि शेकडो लोकांपर्यंत पोहोचत होती; मग संबंधित यंत्रणा नेमकी कुठे होती? २२ मृत्यू झाल्यानंतरच धाडी आणि निलंबनांची मालिका सुरू होणे, ही व्यवस्थेच्या अपयशाची कबुली नाही का? भिवंडीपासून पुण्यापर्यंत पसरलेल्या या साखळीने दाखवून दिले की, गुन्हेगारांइतकीच निष्क्रियताही घातक असते. आता दोषींना शिक्षा मिळणे आवश्यक आहेच; पण भविष्यात अशा मृत्यूंची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्री देणारी कठोर व्यवस्था उभी राहणे त्याहून अधिक आवश्यक आहे.