महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – सातारा – दि. २४ सप्टेंबर – कोयना पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून शिवाजी सागर जलाशयात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या जलाशयात ७ हजार २७८ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याची आवक सुरू आहे. १०५.२५ टीएमसी इतकी पाणीसाठवण क्षमता असलेल्या धरणातील साठवण क्षमता संपुष्ठात आल्याने धरणाचे सहा वक्री दरवाजे पाऊन फुटाने उचलून ७ हजार १७४ आणि पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीनंतर २ हजार १०० असा एकूण ९ हजार २७४ क्युसेक्स प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला असल्याची माहिती धरण व्यवस्थापन सुत्रांकडून देण्यात आली.
चालूवर्षी पावसाने चांगली साथ दिल्याने कोयना धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. ऑगस्ट महिन्यात धरणातील पाणीसाठ्याने नव्वदी पार केली होती. ऑगस्ट महिन्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होत होती. त्यामुळे १४ ऑगस्ट रोजी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात झाली होती. तब्बल ५६ हजार क्युसेक्स पर्यंत पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होवून पाटणसह, कराड, सांगली परिसरात महापुराचा धोका निर्माण झाला होता. मात्र सप्टेंबर महिन्यात पावसाचा जोर कमी झाल्याने विसर्गही बंद करण्यात आला होता. अधून मधून पडणाऱ्या पावसामुळे धरणातील पाणीसाठा शंभरीकडे निघाला होता. अखेर गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाणलोट परिसरात पावसाने सुरूवात केल्याने सध्याच्या घडीला कोयना धरण ओव्हरफ्लो झाले आहे.
कोयना धरण सद्यस्थितीत पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात १०५.२५ टीएमसी एवढा पाणी पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे बुधवारी दुपारी १ वाजता धरणाचे २ दरवाजे एका फुटाने उघडून व पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता. मात्र दिवसभरात शिवाजीसागर जलाशयात येणाऱ्या पाण्याची आवक वाढतच गेल्याने धरणाचे सर्व दरवाजे पाऊण फुटाने उचलून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.