![]()
मुलींना मोफत प्रवासाची भेट, मुलांना ६७ टक्के सवलत; पाससाठी आता आगाराच्या फेऱ्यांना पूर्णविराम
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. ११ जून २०२६ ।। शाळा सुरू झाली की विद्यार्थ्यांच्या दप्तरासोबत आणखी एक ओझे वाढायचे ते म्हणजे एसटी बसच्या पाससाठी आगारात माराव्या लागणाऱ्या फेऱ्यांचे. रांगा, कागदपत्रांची लगबग, अधिकाऱ्यांच्या टेबलाभोवती होणारी गर्दी आणि पालकांची धावपळ हा दरवर्षीचा ठरलेला कार्यक्रम असायचा. मात्र यंदा राज्य परिवहन महामंडळाने हा जुना अध्याय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना आता पाससाठी बसस्थानकात जाण्याची गरज नाही. उलट एसटीच विद्यार्थ्यांच्या दारी येणार आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जाऊन थेट पास वाटप करण्याची मोहीम महामंडळाने हाती घेतली असून त्यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत असताना एसटी प्रशासनानेही आपली तयारी पूर्ण केली आहे. राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या याद्या तयार करून अधिकाऱ्यांच्या भेटी सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना पाससाठी आता उन्हातान्हात भटकावे लागणार नाही. शाळेच्या परिसरातच अर्ज, तपासणी आणि पास वितरणाची प्रक्रिया पार पडणार आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ही मोहीम राबविली जात असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांकडून होत असलेली मागणी अखेर प्रत्यक्षात उतरल्याने पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
या निर्णयाचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मोफत बस प्रवास योजनेअंतर्गत पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना कोणतेही शुल्क न भरता एसटीचा पास मिळणार आहे. दुसरीकडे मुलांसाठीही मोठा दिलासा देण्यात आला असून मासिक पासच्या रकमेपैकी केवळ ३३ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. म्हणजेच तब्बल ६७ टक्के सवलतीचा लाभ त्यांना मिळणार आहे. शिक्षणासाठी रोज अनेक किलोमीटर प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय आर्थिक आधार ठरणार आहे. वाढत्या महागाईच्या काळात शासनाकडून मिळालेली ही सवलत अनेक कुटुंबांचे बजेट सावरणारी ठरणार आहे.
पहिलीपासून पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी केवळ शाळा किंवा महाविद्यालयाने दिलेले बोनाफाईड प्रमाणपत्र, एक छायाचित्र आणि महामंडळाचा अर्ज आवश्यक राहणार आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या मार्गांवरील बस वेळेत धावतील यासाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे. शिक्षणाचा प्रवास अधिक सोपा, स्वस्त आणि सुलभ करण्याच्या दिशेने एसटी महामंडळाने उचललेले हे पाऊल विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने ‘पास’ नव्हे तर भविष्याकडे जाणारा नवा मार्ग ठरणार आहे.
