![]()
वादळ-पावसाने देश हादरला; उष्णतेने महाराष्ट्र होरपळला
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. १५ जून २०२६ ।।देशाच्या आकाशात काळे ढग दाटून आले आहेत, पण महाराष्ट्राच्या नशिबी अजूनही उन्हाची शिक्षा कायम आहे. एका बाजूला उत्तर भारतापासून ईशान्य भारतापर्यंत पावसाचे तांडव सुरू होण्याचे संकेत मिळत असताना, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील नागरिक मान्सूनच्या एका सरीसाठी डोळे लावून बसले आहेत. हवामान विभागाने तब्बल आठ राज्यांसह अनेक भागांना पुढील १२ तासांसाठी मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट आणि ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा इशारा दिला आहे. मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला अद्यापही प्रतीक्षाच आली आहे. त्यामुळे “ढग आहेत, पण पाऊस नाही” अशी अवस्था राज्यभर निर्माण झाली आहे.
उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि ईशान्येकडील अनेक राज्यांमध्ये हवामानाने अचानक रौद्ररूप धारण करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वादळी वाऱ्यांमुळे झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि शेतीचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे. शेतकरी, मच्छीमार आणि मोकळ्या जागेत काम करणाऱ्या नागरिकांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये पावसाच्या सरी कोसळणार असताना महाराष्ट्र मात्र उन्हाच्या चटक्यांनी भाजत असल्याचे चित्र दिसत आहे.
मान्सूनचे पाऊल महाराष्ट्रात पडले खरे, पण त्याची वाटचाल अचानक थांबली आहे. गेल्या चार दिवसांपासून मान्सून सोलापूर आणि हर्णे परिसरातच स्थिरावला असून पुढे सरकण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली नाही. परिणामी मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट पुन्हा डोके वर काढत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला आणि वाशिम येथे यलो अलर्ट तर अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. जून महिन्यात पावसाऐवजी उष्णतेचे फटके बसू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
विशेष म्हणजे, केरळमध्ये उशिरा दाखल झालेला मान्सून सुरुवातीला वेगाने धावत गोवा आणि तळकोकणपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातही लवकर पाऊस होईल, अशी आशा निर्माण झाली होती. पण आता ही आशा धूसर होताना दिसत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवस वातावरणात मोठे बदल होईपर्यंत राज्याला जोरदार पावसासाठी प्रतीक्षा करावी लागू शकते. त्यामुळे सध्या तरी महाराष्ट्रासाठी ढगांचे दर्शन आहे, पण पावसाचे वरदान अद्याप दूरच असल्याचे वास्तव नागरिकांना स्वीकारावे लागत आहे.
