![]()
लोकलपासून एक्स्प्रेसपर्यंत कडक मोहीम; ब्रेथ ॲनालायझर तपासणीने बेफाम प्रवाशांवर पोलिसांचा फास आवळणार
महाराष्ट्र २४ ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २९ जून २०२६ ।। रेल्वेचा डबा हा प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी असतो, कोणाच्या दारूच्या नशेचा अड्डा बनण्यासाठी नव्हे, हे अखेर प्रशासनाने ओळखले आहे. लोकल असो वा एक्स्प्रेस, मद्यधुंद अवस्थेत प्रवास करून इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्यांवर आता लोहमार्ग पोलिसांचा थेट कायद्याचा हात पडणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पुणे विभागात विशेष मोहीम राबवली जाणार असून, संशयित प्रवाशांची ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जाईल. दोषी आढळल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई होणार आहे. मुंबईतील लोकलमधील अलीकडील खुनाच्या घटनेनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी हा निर्णायक टप्पा मानला जात आहे.
आजवर अनेक प्रवाशांनी रेल्वेच्या डब्यांत मद्यधुंद प्रवाशांचा उच्छाद सहन केला. शिवीगाळ, धक्काबुक्की, महिलांशी गैरवर्तन, भांडणे आणि दहशतीमुळे सामान्य प्रवाशांचा प्रवास त्रासदायक ठरत होता. आता मात्र प्रत्येक संशयितावर पोलिसांची नजर असेल. पुणे-लोणावळा लोकल, डेमू आणि पुण्याहून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये विशेष गस्त घातली जाणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणे किंवा नशेत प्रवास करणे सिद्ध झाल्यास महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ८५(१) अंतर्गत गुन्हा दाखल होईल. पहिल्या गुन्ह्यासाठी सहा महिन्यांपर्यंत कारावास, तर पुन्हा तोच प्रकार केल्यास एका वर्षापर्यंत तुरुंगवासाची तरतूद असल्याने बेफिकीर प्रवाशांना आता कायद्याची खरी चव चाखावी लागणार आहे.
या मोहिमेत रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) देखील खांद्याला खांदा लावून सहभागी होणार आहे. ज्या गाड्यांमध्ये लोहमार्ग पोलिस उपलब्ध नसतील, तेथे आरपीएफचे जवान गस्त घालतील. पुणे स्थानकापुरतीच ही कारवाई मर्यादित राहणार नसून, पुणे विभागातील प्रमुख रेल्वे स्थानके आणि विविध गाड्यांमध्ये तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. रेल्वे प्रशासनाचा स्पष्ट संदेश आहे—प्रवाशांच्या सुरक्षिततेशी तडजोड केली जाणार नाही. रेल्वे हा सार्वजनिक प्रवासाचा मार्ग आहे; दारूच्या नशेत दादागिरी करण्याचे मैदान नाही.
या निर्णयामुळे सर्वाधिक दिलासा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांना मिळणार आहे. कायद्याची भीती निर्माण झाली तर गुन्हेही कमी होतात, हे प्रशासनाचे गणित आहे. त्यामुळे रेल्वेतील दारुड्यांचा उन्माद रोखण्याची ही मोहीम केवळ तपासणीपुरती मर्यादित न राहता, शिस्त आणि सुरक्षिततेची नवी संस्कृती निर्माण करणारी ठरू शकते. “प्रवाशांची सुरक्षा हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता असून, मद्यधुंद प्रवाशांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा पुणे लोहमार्ग पोलिस अधीक्षक डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिला आहे. आता रेल्वेच्या डब्यात दारूची नशा नव्हे, तर कायद्याचीच धाकदपटशा दिसणार, हे निश्चित.