![]()
HULकडून दरवाढीचे संकेत; पेंटपासून FMCGपर्यंत खर्चाचा भार वाढण्याची शक्यता, जूनमध्ये महागाई ४.३८ टक्क्यांवर
महाराष्ट्र २४ ।। ऑनलाईन ।। विशेष प्रतिनिधी ।। दि. २ ऑगस्ट २०२६ ।। सण आला की घरात खरेदी वाढते आणि बाजाराला सुगीचे दिवस येतात; पण यंदा ग्राहकांच्या खिशालाच सुगीचे दिवस येतील असे दिसत नाही. दिवाळी-दसरा जवळ येण्याआधीच रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढण्याची चाहूल लागली आहे. कच्चा माल, ऊर्जा आणि वाहतूक खर्चातील वाढीचा दबाव कंपन्यांवर असल्याने डिटर्जंट, डिशवॉशसारख्या FMCG वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरने पुढील काळात निवडक उत्पादनांवर आणखी दरवाढ करण्याचे संकेत दिले आहेत. कंपनीने सांगितले की, कमोडिटी महागाईचा दबाव कायम असून आतापर्यंत झालेल्या खर्चवाढीपैकी काही भागच ग्राहकांवर टाकण्यात आला आहे. म्हणजेच महागाईची तलवार अजून म्यानात गेलेली नाही.

पेंटच्या बाबतीत तर ग्राहकांना दरवाढीचा धक्का आधीच बसला आहे. आशियन पेंट्सने कच्च्या मालाच्या वाढलेल्या खर्चाचा हवाला देत जुलैमध्ये सुमारे १२ टक्के दरवाढ केली. पश्चिम आशियातील संघर्षामुळे क्रूडशी संबंधित कच्च्या मालाच्या किमती आणि पुरवठ्यावर दबाव वाढल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र २९ जुलैच्या ताज्या निकालांनंतर कंपनीने तातडीने आणखी दरवाढ करण्याची गरज नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे “सगळ्या वस्तू उद्यापासून महागणार” असा सरसकट निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल; पण उत्पादन खर्चाचा दबाव बाजारात स्पष्टपणे दिसत आहे.
महागाईची खरी चिंता आकडेवारीतूनही दिसते. केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार जून २०२६ मध्ये देशातील किरकोळ महागाई ४.३८ टक्क्यांवर पोहोचली, जी मे महिन्यातील ३.९३ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे अन्नमहागाई ५.३२ टक्क्यांवर गेली आहे. ग्रामीण भागातील किरकोळ महागाई ४.७४ टक्के तर शहरी भागातील ३.९२ टक्के होती. त्यामुळे घरगुती बजेटवर आधीच अन्नधान्याचा दबाव असताना साबण, डिटर्जंट, पेंट, इलेक्ट्रॉनिक्स, कपडे किंवा वाहनांसारख्या वस्तूंच्या किमती वाढल्या तर सणासुदीची खरेदी आणखी महाग होऊ शकते.
आता सगळ्यांच्या नजरा रिझर्व्ह बँकेच्या ऑगस्टमधील पतधोरणाकडे लागल्या आहेत. जूनमध्ये रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता आणि ताज्या Reuters पोलमध्ये बहुतांश अर्थतज्ज्ञांनी ऑगस्टमध्येही दर कायम राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र तेलाच्या किमती, पश्चिम आशियातील संघर्ष, मान्सून आणि देशांतर्गत महागाई यांचा पुढील निर्णयांवर प्रभाव राहणार आहे. सणासुदीच्या बाजारात ग्राहकांची मागणी वाढणारच; पण त्याचवेळी कंपन्यांनी खर्चाचा भार किती ग्राहकांच्या माथी मारायचा, हा खरा प्रश्न आहे. कारण पगार वाढण्यापूर्वी किंमती वाढल्या, तर सणाचा आनंदही शेवटी हिशेबाच्या वहीतच अडकणार!