महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १ ऑक्टोबर – पुणे – कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनात कपात लागू झाली. असे असताना दररोज आहारातील भाज्यांचे भावही गगनाला भिडले असल्याने जगायचे कसे आणि खायचे तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावू लागला आहे. बहुतेक भाज्यांनी किलोला शंभरी गाठली आहे.
शाकाहारी आहारात वापरल्या जाणाऱ्या भाज्यांकडे जास्त कल असलेल्या नागरिकांना आता भाज्या घेणे देखील परवडत नाही. गवार, फ्लॉवर, फरसबी यांसारख्या भाज्या १२० रुपये किलो, भेंडी 100 रुपये किलो झाली असून कोथिंबीरची एक जुडी ४० ते५० इतक्या भावाने विकली जात आहे. तसेच कोबी १०० रुपये किलो झाली आहे. लिंबाचा भाव देखील वधारला आहे. ३ लिंबू १० रुपयांना विकले जात आहेत. शेवग्याच्या शेंगा 30 रुपयांना 3 असून, सिमला मिरची 80 रुपये किलो दराने विक ली जात आहे. आठ दिवसांपूर्वी हिरवा वाटाणा 200 रुपयांनी विकला जात होता .
त्यामानाने काकडी 60 तर टोमॅटो 50 रुपये असल्याने त्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून येतो. कोरोना महामारीत लॉकडाऊन जरी हळूहळू शिथिल केला जात असला तरी मात्र बाजारात अनेक वस्तूंच्या दरात वाढ होत असल्याने त्यात सर्वसामान्य नागरिक होरपळ होत आहे.
वाहतुकीचा परिणाम, इंधनाचे वाढलेले दर तसेच मागणीनुसार भाजीपाला पुरवठा होत नाही. कोरोनामुळे अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे भाज्यांचे दर देखील वाढले आहेत असे भाजी विक्रेत्यांचे म्हणणे आहे.