महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ ऑक्टोबर – राळेगंज – गेल्या वर्षी हैदराबाद येथील पोलिस चकमकीचे समर्थन करून नंतर अडचणीत आलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी हाथरस प्रकरणावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नसून मानवतेची हत्या आहे. यातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक वाटते, अशी प्रतिक्रिया हजारे यांनी दिली आहे.
२०१९ मध्ये हैदराबाद येथील एका डॉक्टर महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता. तेथील पोलिसांना आरोपींना अटक केली. नंतर ते चार आरोपी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारले गेले. त्यावेळीही देशभर संतापाची लाट उसळली होती. तेव्हा प्रतिक्रिया देताना हजारे म्हणाले होते, ‘देशात महिलांवरील अत्याचार आणि खुनाच्या घटना वारंवार घडत आहे. त्याचे खटले फास्ट ट्रॅक कोर्टात चालवूनही आरोपींना लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच आहे. काही सामाजिक कार्यकर्ते, वकील, नेते मंडळी या चकमकीला गुन्हा समजत असतील. मात्र, अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपींना लवकर फाशी होत नसेल तर एन्काउंटर योग्यच आहे.’
हजारे यांच्या प्रतिक्रियेवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आता हाथरस येथील प्रकरणासंबंधी हजारे यांनी संयमित मत व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये काही नराधमांनी एखा मुलीसोबत दुष्यकृत्य केले आहे. हा मानवतेवरील कलंक आहे. ही केवळ त्या मुलीची हत्या नाही तर मानवतेची हत्या आहे. भारत हा ऋषीमुनींचा देश म्हटला जातो. भारताची संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. अशा देशात लाजेने मान खाली घालावी लागणारे दुष्कृत्य होणे हे योग्य नाही. आणखी एक चिंताजनक गोष्ट म्हणजे ज्यांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळायची, ते लोक यात कमी पडत आहेत. ही गोष्ट देशासाठी चिंताजनक आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून अशा नराधमांना फाशी देणे आवश्यक आहे,’ असे हजारे यांनी म्हटले आहे.
