महाराष्ट्र २४ ऑनलाईन – प्रतिनिधी – दि. ८ ऑक्टो. – कोल्हापूर – खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने मराठा समाजाला फसवल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच राज्य सरकार त्यांच्या हातात असणा-या गोष्टीदेखील का करत नाही, असा सवाल केला आहे. ‘सारथी संस्थाही सरकारने बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. मराठा समाजासोबत ते किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी,’ असे संभाजीराजे यांनी सांगितले.
संभाजीराजे यांनी राज्य सरकारवरही सडकून टीका केली. ते म्हणाले, ‘मराठा समाजाला सरकारनं फसवलं आहे. राज्य सरकारच्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या ते का करत नाही? आरक्षण हा समतेचा लढा आहे. आरक्षण आमच्या हक्काचं आहे आणि आम्ही ते मिळवणारच. सरकारने सारथी संस्थाही बुडीत घातली. अण्णासाहेब पाटील महामंडळाला सरकारने काय दिलं? राज्य सरकारने त्याचा खेळखंडोबा केला. ते मराठा समाजासोबत किती खेळणार? मराठा समाजातील आमदारांनी सुद्धा याची जबाबदारी घ्यायला हवी.’
संभाजीराजे म्हणाले, ‘आमच्या व्यथा दु:ख समजून घ्या. ९३ टक्के मराठा समाज गरीब आहे. ओबीसी समाजाचे अनेक नेते आले. धनगर समाजाचे मुस्लीम समाजाचे नेते आले. त्यांचं कौतुक आहे. आम्हाला ओबीसीमध्ये घुसायचं नाही. ओबीसी नेते आणि आमच्यात कुठलाही दुरावा होणार नाही. उठसूठ सुशांत प्रकरण, आमच्याकडे पण लक्ष द्यावे अशी मीडियाला विनंती आहे.’
आता संयम राहणार नाही
‘संभाजीराजे आता संयमी राहणार नाही. सकल मराठा समाजाने काही निर्णय घेतले तर त्याला माझं समर्थन आहे. मी कायम तुमच्यासोबत आहे. सगळ्या आमदारांना माझी विनंती आहे की त्यांनी मंत्र्यांना निरोप द्यावेत. मंत्र्यांनी मराठा समाजाची व्यथा, दु:ख यावर कॅबिनेटमध्ये चर्चा करावी. मुख्यमंत्री, मंत्री हे राज्यपालांना मराठा समाजाच्या व्यथा सांगू शकतात. राज्यपाल, राष्ट्रपती यांना सांगून विशेष अधिकार मिळू शकतो’, असंही संभाजीराजे यांनी नमूद केलं.