महाराष्ट्र २४ ऑनलाईन – वृत्तसेवा – प्रतिनिधी – जळगाव – दि. २१ ऑक्टो – :गेल्या 40 वर्षे मी भाजपचे काम केले. भाजप जिथे पोहोचला नव्हता, तिथे आम्ही पोहोचवला. पक्षाविषयी माझी कुठलीही तक्रार नाही. मात्र, देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहे आणि फक्त फडणवीसांमुळेच नाईलाजाने पक्ष सोडतोय, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले. भाजपला रामराम केल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.
ते म्हणाले, फडणवीस यांनी बनावट खटला दाखल केल्याने मी नाराज आहे. त्यांनी मला छळले, माझ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करायला लावला. माझे जीवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. मला पक्षातून ढकलून लावले. भाजप सोडताना खंत आहे. एसीबी चौकशी, भूखंड प्रकरण, दमानिया यांनी विनयभंगाचा खोटा खटलाही दाखल केला. पोलिसांच्या नकारानंतरही देवेंद्रजींनी सांगितल्याने खटला नोंदवला गेला, अशी टीका एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.
पुढे ते म्हणाले, आतापर्यंत जे मिळवले ते स्वतः च्या ताकदीने मिळवले, कुणाच्या उपकाराने, घराणेशाहीने मिळवले नाही. तसेच माझ्यासोबत एकही आमदार, एकही खासदार नाही. रक्षाताईंनी भाजप सोडणार नाही असे सांगितले आहे, त्यांचा निर्णय घेण्यासाठी त्या सक्षम आहेत, असेही खडसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
तसेेेच मला राष्ट्रवादीने कोणतेही आश्वासन दिले नाही. मंत्रिपदाबाबत राष्ट्रवादीच सांगू शकेल. मला पदाची अपेक्षा नाही. माझ्या ताकदीने मी पदे मिळवली आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.