शालेय शिक्षणासंदर्भात नवीन कायदा करा, शिवसेनेची वर्षा गायकवाड यांच्याकडे मागणी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ नोव्हेंबर – मुंबई -शाळांची कमाल व किमान फी किती असावी हे ठरविणे पालकांच्यादृष्टीने आवश्यक असून शालेय शिक्षणासंदर्भात नवीन कायदा करून शाळांची फी निश्चिती करावी, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे करण्यात आली आहे.

सद्यस्थितीत राज्यात शालेय शिक्षणासंदर्भात अस्तित्वात असलेले कायदे गेल्या काही वर्षातील शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलांमुळे कालबाह्य ठरत आहेत. शाळा अवाच्या सव्वा फीवाढ करीत असून अरेरावीला आवर घालण्यासाठी नवीन कायदा करण्याची आवश्यकता आहे. तसेच राज्यात बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा लागू झाला असल्याने अस्तित्वात असलेल्या कायद्यातील तरतुदी बदलणे गरजेचे असल्याचे शिवसेनेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले.

गुजरात सरकारनेही कायदा करून सर्व शाळांना किमान व कमाल फीची मर्यादा निश्चित करून दिली आहे. याचधर्तीवर महाराष्ट्रातही फी निश्चिती करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आमदार, विभागप्रमुख विलास पोतनीस व आमदार मनीषा कायंदे यांनी वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. यावेळी शिक्षणमंत्र्यांनी सदर कायदा करण्याबाबत ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी शाळांची प्रवेश प्रक्रिया, शुल्क रचना, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे प्रश्न ह्या विषयांवरदेखील चर्चा झाली. यावेळी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे आमदार कपिल पाटील उपस्थित होते.

शिक्षकांचे निवृत्ती वय 60 वर्षे करा

केंद्र शासनाने पाचव्या वेतन आयोगापासून शिक्षकांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे. त्याचप्रमाणे राज्यातील मान्यताप्राप्त, तसेच अनुदानित शैक्षणिक संस्थेच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे सेवानिवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याबाबत सकारत्मक निर्णय घ्यावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *