गड, किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विकास आराखडा बनवा : अमित देशमुख

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ४ नोव्हेंबर – महाराष्ट्रातील गड किल्ले आणि स्मारके ही महाराष्ट्राचे भूषण आहेत. त्यामुळे या ऐतिहासिक आणि वैभवशाली वारशांची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी, या ऐतिहासिक स्थळांना अधिकाधिक लोकांनी भेट द्यावी यासाठी पुरातत्व संचालनालयाने ‘सर्किट ऑफ कॉन्झर्व्हेशन अँड डेव्हलपमेंट प्लॅन’ तयार करावा, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिल्या.

राज्यातील गड किल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, राज्य पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात यांच्यासह गड संवर्धन समितीचे सदस्य उपस्थित होते.

देशमुख म्हणाले की, महाराष्ट्रात ४३६ किल्ले आणि ३७६३ स्मारके आहेत. यांचा विकास आराखडा तयार करीत असताना विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापरही करण्यात यावा, तसेच हा आराखडा कशा पद्धतीने कार्यान्वित करण्यात येईल याबाबतही अभ्यास करावा. हा आराखडा तयार करीत असताना आंतरराष्ट्रीय आणि विविध राज्यांमध्ये कशा पद्धतीने आराखडा तयार करण्यात आला आहे, याचा अभ्यास करावा. तसेच महाराष्ट्रातील इतिहास संशोधक, ऐतिहासिक वास्तूविशारद यांची सुद्धा मते जाणून घ्यावीत. गड किल्ले किंवा स्मारक यांचे पुस्तक तयार करणे, स्थानिक गाईडची मदत घेणे, ऑडिओ व्हिज्युअल फिल्मस् तयार करणे, लाईट अँड साऊंड शो, अ‍ॅप विकसित करता येईल का, तेथील पर्यटन सुविधा याबाबतही अभ्यास करण्यात यावा, असेही सांस्कृतिक कार्य मंत्री देशमुख यांनी यावेळी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *