महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. ९ डिसेंबर – नव्या कृषी कायद्यांविरोधातील ‘भारत बंद’ला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सर्वच ठिकाणी शेतकऱ्यांची निदर्शने शांततेत पार पडली खरी; पण राजकीय पक्षांनी केलेला गुंता सुटला नाही.
केंद्रीय गृहमंत्री अिमत शहा यांनी दुपारी ४ वाजता शेतकऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण दिले. केंद्रीय कॅबिनेटची बुधवारी बैठक असून या बैठकीनंतर सरकार कायद्यातील दुरुस्तीचा लेखी प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या बैठकीकडे लक्ष लागून होते. दरम्यान, शेतकरी मात्र कायदा रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. शहा यांच्यासोबतच्या बैठकीसाठी ५ शेतकरी नेत्यांना बोलावण्यात आले. नंतर १३ नेते भेटले. बैठक आधी शहा यांच्या निवासस्थानी ठरली होती. ऐनवेळी ती आयसीएआर गेस्ट हाऊसमध्ये झाली. शहा यांनी अनेक तज्ज्ञांना बैठकीसाठी बोलावले होते. कोणते बदल केल्यास त्याचे भविष्यात काय परिणाम होतील ते तज्ज्ञ शेतकऱ्यांना समजावून सांगत होते. तरीही शेतकरी नेते आक्षेप घेत होते. त्यामुळेच सूचनांनुसार मध्यममार्गी तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला.