महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १२ डिसेंबर – अकरावी ऑनलाइन प्रवेशांची तिसरी फेरी शिक्षण संचालनालयाने जाहीर केली आहे. यानुसार तिसरी गुणवत्ता यादी १५ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता जाहीर होणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाच्या भाग १ मध्ये आवश्यकता असल्यास बदल करून घेण्यासाठी आणि नियमित फेरी ३ साठी पसंतीक्रम नोंदवण्यासाठी १२ डिसेंबर पर्यंतचा अवधी आहे. विद्यार्थ्यांनी आपला अर्ज दिलेल्या वेळेत भरून सबमिट करणे गरजेचे आहे. १५ डिसेंबर रोजी जी गुणवत्ता यादी जाहीर होईल, त्यानुसार प्रवेश निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर सकाळी ११.३० पासून १८ डिसेंबर सायंकाळी ५ वाजेपर्यंतचा वेळ आहे.
अकरावीच्या दुस-या प्रवेश फेरीत महाविद्यालय मिळूनही मुंबई महानगर परिसरातील ४८ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला नाही. दुस-या प्रवेश फेरीत २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. तिस-या फेरीची प्रक्रिया सुरू झाली असून या फेरीसाठी १ लाख १९ हजार ५८१ जागा रिक्त आहेत.
दुस-या प्रवेश फेरीत ७६ हजार २३१ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले होते. त्यापैकी ३१ हजार ८१८ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी संमती दर्शविली होती. मात्र त्यापैकी अवघ्या २८ हजार ६१ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. संमती दर्शविलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांनी संपर्क साधूनही त्यांनी प्रवेश घेण्यास नकार दिला.