महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ डिसेंबर -.पुण्यात थंडीचा कडाका अंशतः कमी झाला असला तरीही विदर्भात हुडहुडी भरत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली. राज्यात सर्वांत कमी तापमान गोंदिया येथे ७.४ अंश सेल्सिअस नोंदले तर, पुण्यातील किमान तापमान ३.३ ने वाढून १३.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रवाह काही प्रमाणात सुरू झाले आहे. यामुळे विदर्भातील काही भागांत थंडीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. त्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्रातही थंडी कमी-अधिक स्वरूपात आहे. राज्याच्या काही भागात वर्षाच्या अखेरीस थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत गोंदियामध्ये किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. अवघ्या चोवीस तासांमध्ये विदर्भातील थंडीचा कडाका वाढला. त्यामुळे गोंदियात किमान तापमान सरासरीपेक्षा ५ अंश सेल्सिअसने कमी झाले. तेथे ७.४ अंश सेल्सिअसची नोंद झाली.
विदर्भातील अकोला, अमरावती, चंद्रपूर, बुलडाणा, नागपूर, वर्धा, यवतमाळ या भागांत थंडी आहे. मराठवाड्यातही गारठा कायम आहे. यामुळे किमान तापमान १० ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, नाशिक, जळगाव भागातील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जात आहे. तेथे किमान तापमान ८ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.