महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. १७ जानेवारी-राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखा मध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नागरिकांना केले आहे.
सुनील केदार म्हणाले, नागरिकांनी मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्याची परस्पर विल्हेवाट लावू नये. प्राण्यामधील संक्रमक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, २००९ च्या कलम ४(१) अन्वये राज्यातील प्रत्येक पशूपालक अथवा इतर कोणतीही व्यक्ती, शासनेतर संस्था, सार्वजनिक संस्था किंवा ग्रामपंचायत, पशुपालक ज्यांना नमूद कायद्याशी संलग्न असणाऱ्या अनुसूचितील रोगाचा संसर्ग झाल्याची शक्यता वाटल्यास त्या वस्तुस्थितीची माहिती नजिकच्या ग्राम अधिकारी किंवा ग्रामपंचायत प्रभारी यांना देणे व त्यांनी ही माहिती नजिकच्या उपलब्ध पशुवैद्यकाला लेखी स्वरूपात कळविणे बंधनकारक असल्याची नोंद घ्यावी. ज्या ठिकाणी बर्ड फ्लूचा उद्रेक झालेला आहे त्याच ठिकाणी नियंत्रित करण्याकरिता राज्यातील प्रत्येकाने दक्षता घेणे आवश्यक आहे.
अंडी व कुक्कूट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवून खाल्ल्यास विषाणू निष्क्रिय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे हे पूर्णतः सुरक्षित आहे. बर्ड फ्ल्यु रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत, अशी सर्व जनतेणे नोंद घ्यावी असेही सुनील केदार यांनी आवाहन केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील दि. १४ जानेवारी २०२१ रोजी, कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, लातूर ४७, गोंदिया २५, चंद्रपूर ८६, नागपूर ११०, यवतमाळ १०, सातारा ५०, त रायगड़ जिल्ह्यात ३, अशी ३३१ मृत झालेली नोंद आहे. सांगली जिल्ह्यात ३४, अमरावती व सोलापूर जिल्ह्यात 1 बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्ष्यांमध्ये व वर्धा येथे ८ मोर अशा एकूण ४४ पक्षांची आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. नाशिक जिल्ह्यात यवतमाळ, नंदुरबार ६. पुणे २ व जळगाव जिल्ह्यात २ अशा प्रकारे एकूण राज्यात ७ कावळ्यांमध्ये मृत आढळून आली आहेत. राज्यातील दि. १४ जानेवारी २०२१ रोजी एकूण ३८२ पक्ष्यांमध्ये मृत झाली आहे. सदर नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत. तपासणीचे निष्कर्ष हाती येण्यास ८ ते ७२ तास लागू शकतात, दि. ८ जानेवारी २०२१ पासून आजतागायत एकूण २३७८ विविध पक्षांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
पूर्वी पाठवलेल्या नमून्याचे तपासणीचे निष्कर्ष राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथून प्राप्त झाले असून, त्यानुसार मुंबई, घोडबंदर (जि.ठाणे) व दापोली या ठिकाणांचे कावळे आणि बगळे तसेच मुरुंबा (ता. जि. परभणी) या ठिकाणचे पोल्ट्री फार्म मधील नमुने हायली पॅयोजैनिक एव्हीयन एन्फ्ल्यूएन्झा (एच5एन1 या स्ट्रेन) करिता आणि बीड येथील नमूने (एच5एन 8 या स्ट्रेन) करिता पॉझिटीव्ह आलेले आहेत. लातूर येथील नमुनेही सकारात्मक झाल्यानुसार, सदर क्षेत्रास “संसर्गग्रस्त क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात येत असून, तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.