नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळाचा विकास होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २१ जानेवारी – छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याचे नेतृत्व करणारे नरवीर बहिर्जी नाईक यांच्या समाधीस्थळाचा पर्यटनदृष्टय़ा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज दिली. सांगली जिह्यातल्या खानापूर तालुक्यातील बाणुरगड येथे बहिर्जी नाईक यांची समाधी आहे.

स्थानिक आमदार अनिल बाबर यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन यासंदर्भातील निवेदन सादर केले. त्याची तातडीने दखल घेऊन बाणुरगड येथील समाधीस्थळ परिसराचा पर्यटनदृष्टय़ा सर्वांगीण विकास करण्याचे आदेश यावेळी आदित्य ठाकरे यांनी दिले.

शिवरायांचा इतिहास आणि त्यांचे कार्य संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी आहे. त्याच पद्धतीने शिवरायांसाठी कार्य करणाऱया मावळ्यांचा इतिहासही प्रेरणादायी आहे. नरवीर बहिर्जी नाईक यांनी गुप्तहेरीमधील आपल्या कौशल्याने स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान दिले. त्यांचे कार्य जगासमोर येण्याच्या दृष्टीने तसेच त्यांच्या कार्यातून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांच्या समाधीस्थळाचा विकास केला जाईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. यासंदर्भात सविस्तर पर्यटन विकासाच्या दृष्टीने तातडीने बैठक आयोजित करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *