महाराष्ट्र २४ – विशेष प्रतिनिधी – दि. २९- पुणे – राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढत चालला आहे. आठवडाभरात राज्यातील विविध भागात कोंबड्या आणि पक्षी मृतावस्थेत आढळले आहेत. पुण्याजवळील मावळमध्ये बर्ड फ्लूचा प्रकोप पाहायला मिळाला. बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे हजारो कोंबड्यांचा मृत्यू झाल्यानंतर या कोंबड्यांची चाचणी घेण्यात आली. या कोंबड्यांचे नमुने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. मृत कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.
साळुंब्रे गावात या पोल्ट्री फार्ममधून प्रशासनाने सुमारे साडेतीन हजार कोंबड्या जमा केली आहेत. खबरदारी म्हणून 10 किलोमीटरपर्यंतचा परिसर 21 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कोरोना कालावधीमध्ये गेल्या 8 महिन्यांपासून पोल्ट्री फॉर्मचा व्यवसाय ठप्प झाला होता. आता बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसायिकांवर संकट ओढावले आहे. अनेक पोल्ट्री फार्म संचालकांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.