महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – दि. २९ जानेवारी – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे अयोध्येत असतील, अशी माहिती मनसेने दिली आहे. राज ठाकरे यांना आधीच अयोध्येत जायचं होतं, पण कोरोनामुळे त्यांना जाता आलं नाही. अयोध्या दौऱ्यावरून 9 मार्चला परत आल्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकांसाठीची रणनीती ठरवण्यासाठी मनसेची आज मुंबईमध्ये बैठक होत आहे, या बैठकीत ही घोषणा करण्यात आली आहे.
याआधी मागच्यावर्षी निवडणुकांआधी आणि निवडणुकांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हेदेखील अयोध्येत गेले होते. निवडणुकांआधी पहिले मंदिर फिर सरकार, अशी घोषणा शिवसेनेनं दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर गेले होते.अयोध्येतून परतल्यानंतर 9 मार्चला मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे जनतेला संबोधित करतील. यानंतर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात होईल. 9 फेब्रुवारी ते 12 एप्रिल या कालावधीमध्ये मनसेची सदस्य नोंदणी होणार आहे.
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये भविष्यातील वाटचालीबाबत भाष्य केलं. मुंबई, पुणे, ठाणे या शहरांमध्ये ज्यांना राजकीय आकांक्षा नसतात, पण शहराचा विकास व्हावा, असं वाटतं त्यांना संधी दिली जाणार आहे. अशा लोकांना शहर रक्षण ही उपमा दिली जाईल, तसंच गटाध्यक्षाला राजदूत म्हणून संबोधलं जाईल, असं मनसेकडून सांगण्यात आलं आहे.
27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन मनसे साजरा करणार आहे. यासाठी मराठी स्वाक्षरी मोहीम राबवणार आहे. राज ठाकरे स्वत: यासाठी मराठी स्वाक्षरी करणार आहेत. यादिवशी मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांचा सन्मान केला जाणार आहे. मराठी पुस्तकं, साहित्यिक, खेळाडू, प्रकाशक यांचा गौरव करण्यात येणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं आहे.