महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१४ ।पुणे । येत्या तीन महिन्यांत पुण्याचे विधान भवन सुरू करण्यात येणार असून, या विधान भवनाचा फायदा पश्चिम महाराष्ट्रातील बळीराजांना होईल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱहे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे.डॉ. गोऱहे म्हणाल्या, मुंबईनंतर नागपूर येथील विधानभवन सुरू करण्यात आले आहे. पूर्वी येथे हंगामी कामकाज पाहिले जात होते. मात्र, आता ते बाराही महिने सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे आता पुण्याचे विधानभवन सुरू करण्यास विधानसभेचे माजी अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनीही मान्यता दिली आहे.
कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र आता सावरत आहे. लसीकरणालाही सुरुवात झाली आहे. राज्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सक्षमपणे लक्ष देत आहेत. कोरोना काळात आरोग्य व्यवस्था सांभाळताना केंद्र व राज्य सरकारने जनतेला योग्य प्रकारे धान्य पुरवठा केला. त्यामुळे उद्योगधंदे बंद असतानाही कुणाचीही उपासमार झाली नाही. कोरोनामुळे ऑनलाइन व्यवसायांना चालना मिळाली आहे. फळप्रक्रिया उद्योगांनाही आता सुगीचे दिवस आले आहेत. राज्याच्या मोठय़ा प्रश्नांबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रश्नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तितकेच लक्ष देऊन सोडवित आहेत. महाबळेश्वर येथील वेण्णालेक व बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी 100 कोटींचा निधी मंजूर केला हे त्याचेच उदाहरण आहे. सुशोभीकरणाचा आराखडाही तयार करण्यात आला असून, एका वर्षात महाबळेश्वर शहराचा कायापालट झालेला सर्वांना दिसेल, असा विश्वासही डॉ. गोऱहे यांनी व्यक्त केला.
1 मार्चपासून सुरू होणाऱया विधिमंडळाच्या अधिवेशनाबाबत राज्याच्या बिझनेस ऍडव्हायजरीची मुख्य बैठक लवकरच होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, दोन्ही सदनांतील विरोधी पक्षनेते, आघाडी सरकारमधील प्रमुख पक्षांचे गटनेते उपस्थित असतील. बजेटबाबत महत्त्वाचे प्रस्ताव या अधिवेशनात सादर केले जातील. एकंदरीत कामकाजाचे स्वरूप या बिझनेस ऍडव्हायजरीच्या बैठकीत निश्चित होईल, अशी माहितीही डॉ. नीलम गोऱहे यंनी दिली.