महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. २४ – देशातील सर्वाधिक कोरोना (coronavirus) प्रकरणं महाराष्ट्रात आहे. त्यामुळे देशातील कोरोना (covid 19) रुग्णांचा आकडा पुन्हा वाढू लागला आहे. याबाबत केंद्र सरकारनंदेखील चिंता व्यक्त केली आहे. दरम्यान मोदी सरकारनं आता उद्धव ठाकरे सरकारला पत्र दिलं आहे आणि राज्यातील कोरोना नियंत्रित ठेवण्यासाठी कोरोना लसीकरणाचा (corona vaccination) वेग वाढवा, अशा सूचना केल्या आहेत.मुंबई, पुणे, ठाणे, अमरावती, नागपूर आणि अकोल्यात कोरोनाची प्रकरणं झपाट्यानं वाढत आहे. वाढत्या कोरोनाला नियंत्रित ठेवण्यासाठी या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग वाढवा. जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना लस द्या, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं पत्रात म्हटलं आहे.
देशात सध्या 1.50 लाखांपेक्षा कमी अॅक्टिव्ह केसेस आहेत. त्यापैकी केरळ आणि महाराष्ट्रातच सर्वाधित आहेत. इथं 50,000 पेक्षा जास्त प्रकरणं म्हणजे जवळपास एकूण प्रकरणांच्या 75% प्रकरणं या दोन राज्यांत आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 36.87% आणि केरळमध्ये 37.85% प्रकरणं आहेत. अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.देशात 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरण मोहीम सुरू झालं. 23 फेब्रुवारीच्या आकडेवारीनुसार देशात एकूण 1.19 कोटी पेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण झालं आहे. दिवसभरात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत 1.61 लाख लोकांना लस देण्यात आली. त्यापैकी 63,458 आरोग्य कर्मचाऱ्यांनी लशीचा दुसरा डोस घेतला. महाराष्ट्रात 9,29,848 जणांनी पहिला आणि 73,858 जणांनी दुसरा डोस अशा एकूण 10,03,706 लोकांनी लस घेतली.
दरम्यान महाराष्ट्रातील लसीकरणाचा वेग कमी असल्याचं याआधी केंद्र सरकारनं सांगितलं होतं. तशी आकडेवारीदेखील केंद्रानं जारी केली होती. आता राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे त्याला नियंत्रित करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा, अशी विनंती केंद्रानं केली आहे.सध्या आरोग्य कर्मचारी आणि त्यानंतर फ्रंटलाइन वर्कर्सना लस दिली जाते आहे. मार्चपासून 50 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींचंही लसीकरण केलं जाणार आहे. ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर आजार असलेल्या नागरिकांचा समावेश असणार आहे. 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.