महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२५। मुंबई । मागील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने होणाऱ्या वाढीमुळे आता सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडू लागले आहे. इंधनदरवाढीचा परिणाम भाजी मंडईवर जाणवू लागला आहे. आठवड्याभरात भाज्यांच्या किंमतीत किमतीत १५ ते २० रुपयाने वाढ झाली आहे. त्याची झळ सर्वसमान्यांना सोसावी लागत आहे.सातत्याने होणार्या इंधन दरवाढीचा परिणाम घाऊक तसेच किरकोळ भाजीपाला बाजारावर जाणवू लागला आहे. ऐन भाजीपाल्याच्या हंगाम असताना भाजीपाल्याच्या किमती कमी होण्याऐवजी वाढत आहेत. घाऊक बाजारात किलामागे १० ते २० तर किरकोळ बाजारात १५ ते २० रुपयांनी भाज्यांचे दर वाढले आहेत. सध्या बाजारात भाजीपाल्याची आवक असतानाही दर वाढत आहेत .
करोना काळात लागू असलेल्या टाळेबंदीमुळे आणि सातत्याने होणाऱ्या अवकाळी पावसाने भाजी पाल्याचे भाव गगनाला भिडले होते. यामुळे करोना काळात कोलमडलेल्या आर्थिक परिस्थितीत नागरिकांच्या स्वयंपाक घराचे गणित सुद्धा बिघडले होते. पण टाळेबंदीत आणलेली शिथिलता आणि डिसेंबर महिन्याच्या थंडीच्या आगमनाबरोबर भाज्यांची आवक वाढली. यामुळे घाऊक बाजारातले भाज्यांचे दर जलद गतीने खाली येऊ लागले होते. याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला होता. पण मागील काही दिवसात इंधन दरवाढीमुळे भाजीपाला वाहतुकीचा खर्च वाढल्याने पुन्हा भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. जानेवारी महिन्यापेक्षा १० ते १५ टक्केपर्यंत या महिन्यात भाव वाढ झाली आहे. तर येणाऱ्या काळात अधिक दर कमी होणार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.